‘राफेलप्रकरणी मोदींनी गंगा नदीत डुबकी घेऊन पापक्षालन करावे’
राफेल करारावरुन मोदी सरकारकडून सर्वोच्च न्यायालयाला चुकीची माहिती दिल्याचा आरोप करत काँग्रेसने पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने राफेल प्रकरणातील आपला निर्णय मागे घ्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे. त्याचबरोबर न्यायालयाने मोदी सरकारला शपथेवर खोटी साक्ष देणे आणि न्यायालयाच्या अवमाननेप्रकरणी नोटीस देण्याचीही मागणी केली आहे. पंतप्रधान कुंभच्या धार्मिक यात्रेला जातानाही खोटं बोलत आहेत. त्यांनी गंगा नदीत जाऊन डुबकी घ्यावी, असे ते म्हणाले.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आनंद शर्मा म्हणाले की, राफेल विमानांच्या किंमतीवरुन कॅगचा अहवाल संसदेच्या लोकलेखा समितीसमोर सादर केल्याचे सांगून सरकारने विशेषाधिकाराचा अवमान केला आहे. ते कुंभच्या धार्मिक यात्रेवर जातानाही खोटं बोलत आहेत. त्यांनी पापक्षालन करायला हवं, त्यांनी पवित्र गंगा नदीत जाऊन स्नान केले पाहिजे, असा टोलाही त्यांनी लगावला.