राजस्थान राज्यानं जाहीर केली फटाक्यांवर बंदी!
जयपूर – राजस्थान सरकारनं यंदा दिवाळीत फटाक्यांच्या विक्रीवर संपूर्णत: बंदी घालण्याचा निर्णय जाहीर केला आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी यासंबंधी अधिकाऱ्यांनाही निर्देश जारी केले आहेत. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी करोना संकटाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचं म्हटलं आहे.
करोना संक्रमणाचा प्रसार रोखण्यासाठी तसंच रुग्णांच्या त्रासात आणखीन वाढ होऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आलंय. फटाक्यांच्या धुरामुळे कोविड १९ संक्रमित रुग्णांना हृदय आणि श्वासासंबंधी आणखीन अडथळे जाणवू शकतात. त्यामुळे, फटाक्यांच्या विक्रीवर आणि परवान्यांवर तात्पुरत्या स्वरुपात बंदी घालण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
मुख्यमंत्री गेहलोत यांच्या निवासस्थानी झालेल्या एका बैठकीनंतर हा निर्णय जाहीर करण्यात आला. फटाक्यांच्या आतिषबाजीमुळे होणाऱ्या वायू प्रदूषणामुळे कोविड १९ च्या रुग्णांसोबतच इतर लोकांनाही हृदय आणि श्वासासंबंधी अडथळे जाणवू शकतात. अशावेळी, लोकांनी दिवाळीत आतिषबाजीपासून लांब राहायला हवं. तसंच जनतेनं लग्न समारंभ आणि इतर सोहळ्यांतही आतिषबाजी बंद करायला हवी, असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय.