‘ये महाविकास आघाडी की दिवार तुटेगी कैसे… सिंमेटसे जो बनी है’, अजित पवारांचा भाजपला टोला
मुंबई | महाईन्यूज | ऑनलाईन टीम
महाविकास आघाडीचे सरकार कधी एकदा पडते, याच्या प्रयत्नात भाजप आहे. त्यासाठी अटोकाट प्रयत्न करूनही अपयश येत आहे. त्यावर अजित पवार यांनी भाजपला जोरदार टार्गेट दिला आहे. ये दिवार तुटती क्यूँ नही… ये महाविकास आघाडी की दिवार तुटेगी कैसे… सिंमेटसे जो बनी है’ अशा शब्दात महाविकास आघाडी पाडण्याचा प्रयत्न करणार्या भाजपाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी टोला लगावला.
मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या मुंबईतील कार्यकर्ता मार्गदर्शन शिबिरात पवार बोलत होते. पक्षाचे ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले. तर, शिबीराचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले. मुंबई ही महाराष्ट्राची अस्मिता आहे. याला धक्का लावण्याचे काम भाजपाने पाच वर्षात केले आहे. प्रकल्प राज्याबाहेर नेले. विकासाला खीळ घातली. हे लोकांना पटवून दिले पाहिजे आणि महाराष्ट्राच्या विकासात आड येणाऱ्या लोकांना आडवं पाडून पुढे जायचं आहे, असा इशारा अजित पवार यांनी दिला.
”येत्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसचे जास्त आमदार आणावयाचे आहेत. जास्तीत जास्त १० आमदार आणि महानगरपालिकेत ५० ते ६० नगरसेवक आले पाहिजेत,” असे आवाहन त्यांनी यावेळी केले. महिन्याचा एक दिवस मुंबईसाठी देण्याचे पवार यांनी जाहीर केले. १६ मंत्र्यांनी एक एक दिवस जरी दिला, तरी चांगलं नियोजन आणि पक्षाचे संघटन वाढेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि मुंबई अध्यक्ष नवाब मलिक,गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, विधी व न्याय राज्यमंत्री अदिती तटकरे, माजी खासदार समीर भुजबळ, आमदार किरण पावसकर, माजी आमदार पंकज भुजबळ, अल्पसंख्याक सेलचे राष्ट्रीय अध्यक्ष शब्बीर विद्रोही, खासदार माजीद मेमन, प्रदेश प्रवक्ते महेश तपासे, मुंबई महानगरपालिकेच्या गटनेत्या राखी जाधव उपस्थित होते.