मराठा आरक्षण ; राज्यभरात मराठा तरुणांवर 276 गुन्हे दाखल
मुंबई – मराठा क्रांती मोर्चाने पुकारलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानंतर राज्यभर आतापर्यंत 276 गुन्हे दाखल झाले आहेत. या संपूर्ण हिंसाचारात चार कोटी 55 लाख सात हजार रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे. 252 जणांना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे. त्यात 19 अल्पवयीन मुलांचा समावेश आहे.
राज्यातील सर्वाधिक म्हणजे 91 गुन्हे कोल्हापूर परिक्षेत्रात दाखल झाले आहेत; तर सर्वाधिक नुकसान नवी मुंबईत झाले आहे. प्राथमिक अंदाजानुसार नवी मुंबईत एक कोटी 35 लाख रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे. त्याच्यापाठोपाठ औरंगाबाद परिसरात सुमारे 90 लाख रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे. राज्यभरात 250 ठिकाणी “रास्ता रोको’, 198 ठिकाणी दगडफेक, 28 ठिकाणी जाळपोळीच्या घटना घडल्या आहेत. या हिंसाचारात 67 पोलिस कर्मचारी जखमी झाले असून मंगळवारी (ता.24) औरंगाबाद येथे जमावाला पांगवताना त्यांच्यामागे धावणारे पोलिस हवालदार लक्ष्मण कडगावकर यांचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. याशिवाय 19 आंदोलकही जखमी झाले आहेत. मराठा आंदोलकांवर 19 जुलैला सहा गुन्हे, 20 जुलैला 19, 21 जुलैला 20, 22 जुलैला 23, 23 जुलैला 27, 24 जुलैला 34, 25 जुलैला 70, 26 जुलैला 60 गुन्हे दाखल झाले होते.
307 सरकारी गाड्यांचे नुकसान
राज्यभर झालेल्या हिंसाचारात 307 सरकारी गाड्यांचे नुकसान झाले आहे, तर 149 खासगी गाड्यांचे नुकसान झाले आहे.