मंडप उभारण्यास परवानगी नाकारल्यानं अनेक शहरांत गणेशोत्सव मंडपाविनाच साजरा
उद्यापासून गणेशोत्सवास सुरुवात होत आहे. यंदा अकरा दिवसांचा हा उत्सव असून गणरायाचे विसर्जन एक सप्टेंबरला होणार आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शहर प्रशासनानं मंडप उभारण्यास परवानगी नाकारल्यानं अहमदनगर शहरातील गणेशोत्सव यंदा मंडपाविनाच साजरा होणार आहे. यंदा प्रशासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याचे निर्देश दिलेले आहेत. तसेच मंडप उभारणीस परवानगी देण्यात आलेली नाही. यामुळे यंदा मंडपविना गणेशोत्सव होणार असून त्यामुळे सार्वजनिक मंडळांची संख्याही घटणार आहे. दरम्यान, दुसरीकडे विघ्नहर्त्या गणरायाच्या आगमनाची तयारी घरोघरी करण्यात येत आहे. बाजारपेठेतील दुकानेही सजावटीच्या साहित्यांनी सजली आहेत. हे साहित्य घेण्यासाठी बाजारपेठेत लगबग सुरू असेलली पहायला मिळत आहे.
गणेशोत्सवामध्ये सार्वजनिक मंडळांना मूर्ती स्थापन करण्यासाठी परवानगी बंधनकारक करण्यात आली आहे. तसेच मंडप उभारता येणार नाही. आरतीसाठी पाच जणांनाच मर्यादा घालण्यात आली आहे. गणेश मंडळांनी आरती, गणेश दर्शन सोशल मीडियावरून लाईव्ह करावे, जेणेकरून नागरिकांची गर्दी होणार नाही, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. सार्वजनिक मंडळांना फक्त चार फूट उंचीची व घरगुती उत्सवात दोन फूट उंचीची मूर्ती बसविण्यास परवानगी देण्यात आलेली आहे. शिवाय स्थापना व विसर्जन मिरवणुकीस बंदी घालण्यात आलेली आहे. यामुळे यंदा सार्वजनिक मंडळांची संख्या घटणार आहे.
दुसरीकडे मात्र घरोघरी गणेशोत्सव ची तयारी सुरू आहे. गणरायाला आकर्षक सजावट करण्यासाठीच्या विविध साहित्यांची दुकाने थाटली आहेत. गणरायाच्या मूर्तीचींही दुकाने ठिकठिकाणी थाटली आहेत. प्रशासनाकडून मूर्तीच्या उंचीसाठी मर्यादा घालण्यात आल्याने बाजारपेठेत लहान मूर्ती विक्रीसाठी जास्त प्रमाणात आल्या आहेत. शहरातील मानाच्या अकरा मंडळांनी गणेशोत्सव साध्या पध्दतीने साजरा करण्याचे स्पष्ट केले आहे.