दहशतवादी कारवायांत सक्रिय होणाऱ्या काश्मिरी तरुणांच्या संख्येत झपाट्याने वाढ
नवी दिल्ली : पाकिस्तानातून घुसखोरी करणाऱ्या विदेशी दहशतवाद्यांची संख्या मागील पाच वर्षात काही प्रमाणात कमी झाली आहे.. मात्र, दहशतवादी कारवायांत सक्रिय होणा-या काश्मिरी तरुणांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याचे सुरक्षा एजन्सींच्या आकडेवारीवरून दिसून येते. गृहमंत्री राजनाथ सिंह हे मागील आठवड्यात जम्मू- काश्मीरच्या दौऱ्यावर होते. या वेळी सुरक्षा एजन्सीने हा अहवाल त्यांना सादर केला.
यावर्षी काश्मीर खोºयात एप्रिलमध्ये २७६ सक्रीय दहशतवाद्यांपैकी ५६ टक्के म्हणजे १५४ अतिरेकी हे स्थानिक तरुण होते. एप्रिल २०१७मध्ये २५१ अतिरेकी हे स्थानिक तरुण होते. याच महिन्यात २०१६मध्ये स्थानिक दहशतवाद्यांचे प्रमाण ५४ टक्के होते. गृह मंत्रालयाच्या एका अहवालावरून दिसून येते की, यावर्षी ३० एप्रिलपर्यंत ५७ अतिरेकी एन्काउंटरमध्ये मारले गेले. यात ३७ स्थानिक पुरुष होते, तर २० विदेशी होते म्हणजे मुख्यत: पाकिस्तानी होते. २०१७मध्ये २१३ अतिरेकी ठार झाले. यात ८५ स्थानिक आणि १२८ विदेशी होते.
दहशतवाद्यांच्या भरतीबाबत कट्टर विचारसरणीचे प्रमाण खूपच कमी होते. यातून असे दिसून आले आहे की, यापैकी फक्त २ टक्के अतिरेकी हे मदरशात शिक्षण घेतलेले होते, तर काही प्रकरणात या तरुणांना प्रेरित करण्यासाठी सोशल मीडियाचा उपयोग झाला. जानेवारी ते एप्रिल २०१७ या काळात १५ जवान शहीद झाले, तर सुरक्षादलाचे २९ जवान २०१८मध्ये याच काळात शहीद झाले. २०१५ ते २०१७ या काळात २०१ जवान शहीद झाले. २०१२ ते २०१४ या काळात ११५ जवान शहीद झाले आहेत.