डॉ भाग्यश्रीताई पाटील यांना कर्तृत्ववान महिला गौरव पुरस्कार प्रदान
पिंपरी |महाईन्यूज|
‘आम्ही पुणेकर’ सह जिजामाता पुरस्कार वितरण समिती महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत कर्तृत्ववान महिला गौरव पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन पत्रकार भवन नवी पेठ, पुणे येथे करण्यात आले होते आयोजकांच्या वतीने विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा यावेळी गौरव करण्यात आली यात राइस अँड शाईन कंपनीच्या संचालिका डॉ. भाग्यश्रीताई पाटील यांना बायोटेक्नॉलॉजी, फलोत्पादन आणि फ्लोरीकल्चर तसेच महिला सबलीकरण या क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल समितीच्या वतीने कर्तृत्ववान महिला गौरव पुरस्कार सर्व मान्यवरांच्या उपस्थित प्रदान करण्यात आला.
यावेळी पं.वसंतराव गाडगीळ, सहधर्मादाय आयुक्त दिलीप देशमुख, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा शकुंतला काळे, प्रकाश देवळे, आयोजक हेमंत जाधव, मनोज पंडित, अमोल शुक्ला, अमर निंबाळकर, संतोष फुटक, तेजस गाडवे, सचिन गुरव, भैया आढाव, आदी उपस्थित होते.
” मला पहिल्या पासून शेतीची आवड होती. शेतकऱ्याचे दुःख मला बघवत नव्हते. जो समज होता की शेतीमधून पैसा मिळत नाही हा समज चुकीचा ठरवायचा होता. यातूनच मी शेतीकडे फुल व फलोत्पादन व्यवसायाकडे वळले माझ्या कंपनी मध्ये ९८ टक्के महिला कार्यरत असून त्या स्वतःच्या पायावर उभ्या आहेत. फक्त पाच महिलांपासूनचा हा प्रवास आज हजार महिला कंपनीत कार्यरत आहे. आजच्या परिस्थिती महिलांनी आपल्यातील कुवत आधी समजली पाहिजे आपण काय करू शकतो त्यादृष्टीने स्वप्न पहा आपल्या ध्येया पर्यंत पोहोचा यासाठी भक्कम आत्मविश्वास गरजेचा आहे. सद्यस्थितीत महिलांनी सावधगिरीने राहिले पाहिजे.” अशी भावना डॉ भाग्यश्रीताई पाटील यांनी व्यक्त केली.
आजच्या काळातील स्त्रिया सक्षम आहेत. पण त्यांच्याकरीता संधी निर्माण करण्याची आवश्यकता आहे. प्रगतीच्या मार्गावर जाण्याकरीता अनेक वाटा आहेत. मात्र, त्या वाटा महिलांना माहित व्हायला हव्यात. सक्षम असलेल्या महिलांनी प्रतिकूल परिस्थितीत असलेल्या महिलांना मदतीचा हात द्यायला हवा. महिलांसाठी प्रतिकूल परिस्थिती हीच प्रेरणा असते, असे मत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा शकुंतला काळे यांनी व्यक्त केले.
शकुंतला काळे म्हणाल्या, महिलांचे सन्मान होणे, हे गौरवास्पद बाब आहे. परंतु सन्मानासोबतच त्यांच्या कर्तृत्वाला वाव मिळेल, अशा संधी देखील उपलब्ध व्हायला हव्या. मुलगा-मुलगी असा भेद न मानता, मुलींचा जन्म आपण आनंदाने स्विकारायला हवा. सक्षमीकरणाची भावना प्रत्येक स्त्री च्या मनात असणे गरजेचे आहे.
दिलीप देशमुख म्हणाले, आज महिला सुरक्षित आहेत का? हा प्रश्न महत्वाचा आहे. दिल्ली, कोपर्डी, हिंगणघाट सारख्या घटना आज घडत आहेत. या घटना जोपर्यंत बंद होत नाहीत, तोपर्यंत महिला सुरक्षित आहेत, असे म्हणता येणार नाही. महिलांनी कोणावरही अवलंबून न राहता स्वत:ची सुरक्षा स्वत: करायला शिकले पाहिजे. महिला सक्षम आहेत, आता सुरक्षित होण्याची गरज आहे, असेही त्यांनी सांगितले.
पुणे टपाल विभागातर्फे माय स्टँम्प अंतर्गत जागतिक महिला दिनानिमित्त विशेष टपाल टिकिटाचे प्रकाशन करण्यात आले. पुणे मनपा शाळेतील गरजू विद्यार्थींना 50 सायकल वाटप, स्थायी व फिरते सुसज्ज आधुनिक स्वच्छतागृह उद्घाटन यावेळी करण्यात आले. तसेच महिलांना स्वसंरक्षणासाठी मार्शल आर्टचे प्रशिक्षण देखील देण्यात आले. प्राजक्ता कोळपकर यांनी सूत्रसंचालन केले.