ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्रराजकारण

जो महाराष्ट्राला नडेल, त्याला महाराष्ट्र गाडेल – उद्धव ठाकरे

येत्या 4 जूननंतर पंतप्रधान इंडिया आघाडीचाच; महाराष्ट्राचे लुटलेले वैभव पुन्हा महाराष्ट्रात परत आणणार

पिंपरी : ज्या शिवसेनेने तुम्हाला पंतप्रधानपदापर्यंत पोहोचवलं. त्यांना तुम्ही नकली सेना म्हणता. तुम्ही माझ्या नाही, महाराष्ट्राच्या पाठीत वार केला. भरभरून आशिर्वाद दिल्यानंतर देखील सगळे उद्योग-धंदे गुजरातला नेले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात प्रेमाने अलिंगन दिले, तर आम्हीही देवू. पण, पाठीत वार केला, तर वाघनखाने पलटवार करू. जो महाराष्ट्राला नडेल, त्याला अशाच पध्दतीने महाराष्ट्र गाडेल, अशा शब्दात शिवसेना (उद्धव बाळासाहे ठाकरे) पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदी आणि भाजपवर तोफ डागली. तसेच, मोदीजी 4 जूननंतर तुम्ही फक्त नरेंद्र मोदी राहाल. पंतप्रधान आमच्या इंडिया आघाडीचा होईल. इंडिया आघाडीचे सरकार आल्यानंतर महाराष्ट्राचे लुटलेले वैभव पुन्हा महाराष्ट्रात आणल्याशिवाय राहणार नाही, असेही ठाकरे म्हणाले.

शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) – काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) – शेतकरी कामगार पक्ष – स्वराज इंडिया – मित्र पक्ष महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांच्या प्रचारार्थ सांगवीतील पीडब्लूडी मैदानावर बुधवार (दि.8 मे) रोजी विराट सभा पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी व्यासपीठावर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री मदन बाफना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे,आपचे खासदार संजय सिंह, काँग्रेसचे चंद्रकांत हंडोरे, शिवसेना संपर्कप्रमुख तथा आमदार सचिन अहिर, सहसंपर्क प्रमुख आदित्य शिरोडकर, उपनेत्या किशोरी पेडणेकर, माजी आमदार अॅड. गौतम चाबुकस्वार, जयदेव गायकवाड, शिवसेना राज्य संघटक एकनाथ पवार, शहरप्रमुख अॅड. सचिन भोसले, कॉंग्रेसचे राष्ट्रीय सचिव पृथ्वीराज साठे, शहराध्यक्ष डॉ. कैलास कदम, राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष तुषार कामठे, मावळ लोकसभा प्रचार प्रमुख योगेश बाबर, स्वराज इंडियाचे नेते मानव कांबळे, सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर, संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते गंगाधर बनबरे, माजी नगरसेवक मारुती भापकर, दत्तात्रय वाघेरे, बाबू नायर, सुलक्षणा धर, उषा वाघेरे, सुमन पवळे, असंघटीत कामगार विभागाचे काशिनाथ नखाते, काँग्रेसचे बाबू नायर, नरेंद्र बनसोडे, संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष प्रवीण कदम, सतीश काळे, अनिल रोहम, अमीन शेख, आम आदमी पार्टीचे पदवीधर प्रदेशाध्यक्ष चेतन बेंद्रे, महिला शहराध्यक्षा मीनाताई जावळे, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी (शरद पवार) गटाच्या पिंपरी चिंचवड महिला शहराध्यक्षा ज्योतीताई निंबाळकर, शिवसेना शहर संघटिका अनिताताई तुतारे, समाजवादी पक्षाचे बि.डी. यादव, मावळ लोकसभेचे समन्वयक केश्रीनाथ पाटील, युवासेना प्रमुख चेतन (अण्णा) पवार, शरद पवार गटाचे इंजि. देवेंद्र तायडे, विशाल जाधव, माधव पाटील यांच्यासह सर्व घटक पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उद्भव ठाकरे पुढे म्हणाले, दिल्लीश्वरांची चावी असलेल्या दोन माकडांना आणखी उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव देखील घेता येत नाही. त्या माकडांना सांगतोय की बाप बदलण्याची गरज मला नाही. तुम्हाला आहे. माझे वडिल चोरून तुम्ही मते मागता. तुमच्या वडिलांचे नाव सांगितले, तर लोक दारात उभे करणार नाहीत. जो नकली शिवसेना म्हणेल, ते बेअकली आहे. त्यांच्याकडे आता काही मुद्दे राहिलेले नाहीत. मोदींना काही ठरवता येत नाही. त्यांचे काय करायचे, ते जनतेने ठरवलेले आहे. नोटबंदी हा काळा पैसा पांढरा करणारा निर्णय होता, हे न्यायमूर्तींनी म्हटले होते.

हे मोदी सरकार नाही, गजनी सरकार आहे. त्यांना काल काय बोलले, ते आज आठवत नाही. अच्छे दिन म्हणत 15 लाख खात्यात येतील, म्हटले होते. पैसे भाजपच्याच खात्यात गेले. त्यांच्या सरकारमधील अर्थमंत्र्यांचे पतींनी इलेक्ट्रॉल बॉण्ड हा सर्वात मोठा घोटाळा म्हटला आहे. कंत्राटी पद्धत आणली. अग्निवीरसारखी योजना चार वर्षे काम देता. बाकी सगळे कंत्राटी, मी कायमस्वरुपी, असे मोदींचे धोरण आहे. पण, आता आम्ही तुमचे कंत्राट संपवणार असून 4 जूनला कंत्राटमुक्त करू.

भाजपला घटना बदलायची आहे. बाबासाहेबांनी लिहिलेली घटना आम्ही पाळाय़ची, हे त्यांना खुपते आहे. तुकारामांच्या वेळेला जो मंबाजी होता. तीच मानसिकता आज यांची आहे. तुम्ही आम्हाला काय हिंदूत्व शिकवता. जय श्रीराम, गणपत्ती बाप्पा मोरया आम्ही पण म्हणतो. जय भवानी, जय शिवाजी या जयजयकारात झोपलेल्या जागा करण्याची ताकद आहे.

मोदी तुम्ही आमच्या सुखात मीठ कालवत आहात. तुम्ही देशाचे पंतप्रधान असताना गुजरात आणि देशात भिंत का बांधत आहात ? तोही आमचा आहे. मात्र, महाराष्ट्रात कंपनी ठेवायची असेल, तर मराठी माणसाला नोकरी द्यावी लागेल. भाजपला राजकारणात मुले होत नाहीत. त्यात आमचा दोष काय ? तुम्हाला मुले होत नाहीत. वडिलही नाहीत. म्हणून मी भाजपला भेकड म्हणतो. जनतेचे प्रेम तुम्ही कमावू शकलेले नाहीत. माझे शिवसैनिक माझे निवडणूक रोखे आहेत, असेही उद्घव ठाकरे यांनी ठणकावले.

मोंदींचा गल्लीबोळात प्रचार, आताच ते रस्त्यावर आले: ठाकरे
भुताची भीती वाटली की राम राम म्हणायचे. आता यांना पराभवाची भीती वाटली की राम राम करत फिरतात. मोदीजी गल्लीबोळात प्रचारासाठी जात आहेत. मुंबईमध्ये तुम्हाला रोडशो करावा लागतो. मग, दहा वर्षात काय कमावले ? आजच त्यांना रस्त्यावर आणले आहे. 4 जूनला आणखी रस्त्यावर आणणार आहोत. त्यांनी मागे अचानक टीव्हीवर येऊन नोटबंदी केली होती. तसेच मोदीजी 4 जूननंतर तुम्ही फक्त नरेंद्र मोदी राहाल. पंतप्रधान आमच्या इंडिया आघाडीचा होईल. तुम्ही जसे नोटाबंदी केली, तसा महाराष्ट्र तुमची नाणेबंदी करेल.

संजोग वाघेरेंना लोकसभेत पाठवा : उद्धव ठाकरे
महाराष्ट्रात सर्वात पहिली उमेदवारी मी संजोग वाघेरे पाटील यांना जाहीर केली होती. त्यांचा प्रचार करण्याची गरज देखील आता उरलेली नाही. हे समोर बसलेला जनसमुदाय़ पाहून स्पष्ट झालेले आहे. त्यांना मावळमधून प्रचंड बहुमताने विजयी करून लोकसभेत पाठवा, असे आवाहन या जाहीर सभेतून उद्धव ठाकरे यांनी मावळ लोकसभा मतदारसंघातील जनतेला केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button