चो-या रोखण्यासाठी ‘सीसीटीव्ही’ सुरु करा – मनसेची मागणी
पिंपरी- निगडी, यमुनानगर, साईनाथनगर या परिसरात पालिकेतर्फे बसविण्यात आलेले ‘सीसीटीव्ही’ कॅमेरे गेल्या काही महिन्यांपासून बंद पडले आहेत. त्यामुळे या परिसरात चो-यांचे प्रमाण वाढले आहे. या चो-या रोखण्यासाठी हे ‘सीसीटीव्ही’ कॅमेरे त्वरित चालू करण्याची मागणी, मनसेचे शहराध्यक्ष व नगरसेवक सचिन चिखले यांनी पालिकेकडे केली आहे.
याबाबत ‘फ’ क्षेत्रिय कार्यालयाचे विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता प्रवीण घोडे यांना निवेदन दिले आहे. त्यात चिखले यांनी म्हटले आहे की, महापालिकेतर्फे 2016 च्या अखेरीस निगडी, यमुनानगर, साईनाथनगरमध्ये ‘सीसीटीव्ही’ कॅमेरे बसविण्यात आले होते. हे कॅमेरे बसविण्यासाठी 50 लाखाची निविदा काढण्यात आली होती. या कॅमे-यांमुळे परिसरातील चो-या, घरफोड्या यासारख्या गुन्ह्यांचा तपास करताना पोलीसांना मोठी मदत होत होती.
मात्र, गेल्या सहा महिन्यांपासून हे कॅमेरे बंद अवस्थेत आहेत. त्यामुळे दरोडा, चोऱ्यांच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. आठवडाभरापूर्वी यमुनानगर एलआयसी कार्यालयाजवळ दरोडा पडला. त्यामध्ये 40 लाखाची रोकड घेऊन दरोडेखोर पळून गेले. दोन दिवसांपूर्वी यमुनानगर येथे एका घरावर दरोडा पडला. दरोडेखोरांनी घरातून दहा तोळे सोने चोरी करुन नेले. या वाढत्या घटनांमुळे नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. त्यामुळे बंद पडलेले ‘सीसीटीव्ही’ कॅमेरे त्वरित चालू करण्याची मागणी, चिखले यांनी निवेदनातून केली आहे. यावेळी मयूर चिंचवडे, बाळा दानवले, रोहित काळभोर, संभाजी गायकवाड, काळुराम वाघमारे, राजु पोपीवाला यांच्या स्वाक्ष-या आहेत.