चीनमधून राज्यात आलेल्या सर्व प्रवाशांची तपासणी!
मुंबई | महाईन्यूज
‘करोना’ विषाणूमुळे होणारा संसर्ग रोखण्यासाठी चीनमधून महाराष्ट्रात आलेल्या प्रत्येक प्रवाशाच्या आरोग्याची तपासणी करण्याचा निर्णय राज्य साथरोग नियंत्रण समितीच्या बैठकीत सोमवारी घेण्यात आला. त्यानुसार, चीनमधून १ जानेवारीपासून मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरलेल्या प्रत्येक प्रवाशाची माहिती घेण्यात येत आहे. त्याचप्रमाणे सध्या रुग्णालयात निरीक्षणाखाली असलेल्या रुग्णांना घरी सोडण्याबाबत धोरणही ठरविण्यात आलेले आहे.
मुंबईतील जी. टी. रुग्णालयातील सभागृहात आयोजित केलेल्या बैठकीला या समितीचे अध्यक्ष डॉ. सुभाष साळुंखे, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, आयुक्त अनुप कुमार, आरोग्य संचालक डॉ. साधना तायडे, डॉ. अर्चना पाटील तसेच संबंधित डॉक्टर व अधिकारी उपस्थित होते. रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या तिन्ही रुग्णांच्या रक्ताच्या नमुन्यांमध्ये जंतुसंसर्ग आढळून आलेला नाही. पुन्हा चार दिवसांनी त्यांच्या रक्ताचे नमुने घेऊन राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडे पाठविण्यात येणार असून, त्या चाचणीतही जंतुसंसर्ग आढळून आला नाही तर रुग्णांना घरी पाठविण्यात येईल, असे आरोग्य विभागाच्या सूत्रांनी सांगितले आहे. एखाद्या रुग्णाची पहिली चाचणी ‘पॉझीटिव्ह’ आली व दुसरी ‘निगेटिव्ह’ आल्यास अशा रुग्णावर रुग्णालयात करोनासाठीचे उपचार करावे असेही या बैठकीत ठरले आहे.