क्वॉरंटाईन सेंटरमध्ये तरूणाची गळफास घेऊन आत्महत्या
गेवराई येथील नगर परिषदेच्या क्वॉरंटाईन सेंटरमध्ये एका संशयित तरुणाने सभागृहात असलेल्या पंख्याला गळफास घेवून आत्महत्या केली. शनिवारी सायंकाळी ही घटना घडली. या घटनेने आरोग्य प्रशासन आणि गेवराई तालुका हादरुन गेला आहे. तरुणाने कोरोनाच्या भीतीने आत्महत्या केल्याची चर्चा होत आहे.
दोन दिवसापूर्वी तालुक्यातील चकलांबा नजीक असलेल्या बाबुलदरा तांडा येथून कोरोनाची लक्षणे आढळल्याने तुकाराम जगन्नाथ जाधव या (वय 35) वर्षीय तरुणाला गेवराई येथील क्वॉरंटाईन सेंटरमध्ये दाखल केले होते. त्याचा शुक्रवारी (दि.10) स्वॉबही घेण्यात आला होता, मात्र अहवाल आला नव्हता. शनिवारी (दि.11) सायंकाळी त्याला जेवणाचा डब्बा घेवून कर्मचारी गेले होते. त्यासाठी त्याला आवाजही दिला, मात्र तो उठलाच नाही. त्यानंतर त्यांनी बाजूला असलेल्या खिडकीतून आवाज देण्याचा प्रयत्न केला, तेव्हा रुग्णांचा मृतदेह पंख्याला लटकत असल्याचे दिसून आले. ही माहिती त्यांनी गेवराई पोलीसांना दिली.
त्यानंतर गेवराई पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पुरषोत्तम चोबे, फौजदार सुनील ऐटवार, विशाल प्रधान, राजू वाघमारे, आरोग्य विभागाचे डॉ.मुकेश कुचेरिया, तलाठी राजेश राठोड हे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. व त्यानंतर आरोग्य प्रशासनातील कर्मचार्यांनी पीपीई कीट परिधान करुन मृतदेह रुग्णालयात हलवला. तरुणाने कोरोनाच्या भीतीने आत्महत्या केल्याची चर्चा होत आहे. दरम्यान या घटनेने क्वॉरंटाईन सेंटरमध्ये थांबलेल्या रुग्णांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.