कोरोना रोखण्यासाठी केलेला पुण्यातला लॉकडाऊन ठरला फोल
पुण्यानं कोरोना विषाणूच्या वाढीबाबत मुंबई, आणि ठाण्यालाही मागे टाकले आहे. पुण्यात 14 जूनपासून लोकडाऊन सुरू आहे. पण लॉकडाऊनच्या या काळातच पुण्यातील आतापर्यंतची सर्वाधिक रुग्णसंख्या नोंद झालीय. आतापर्यंतचे मृत्यूही याच कालावधीत नोंदले गेले आहेत. त्यामुळं पुण्यातील लॉकडाऊन अपयशी ठरल्याचा आरोप होऊ लागलाय. 23 तारखेच्या पुढे जर लॉकडाऊन वाढवण्यात आला तर आपण आंदोलन करू, असा इशारा व्यापाऱ्यांनी आधीच दिला आहे.
14 जून ते 21 जुलै या कालावधीत पुणे जिल्ह्यात 16561 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडलेत तर 344 रुग्णांचा या कालावधीत कोरोनामुळे मृत्यू झालाय.
६ जून ते 13 जून या आधीच्या सात दिवसांच्या कालावधीत पुण्यात 11236 कोरोना रुग्णांची नोंद झाली होती तर 228 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला होता.
म्हणजे लॉकडाऊनच्या या कालावधीत पुण्यातील आतापर्यंतची सर्वाधिक रुग्णसंख्या आणि मृत्यूंची संख्या नोंदली गेलीय.
ही आकडेवारीच पुण्यातील लॉकडाऊन सफल झाला की अपयशी झाला हे सांगण्यास पुरेशी आहे. व्यापारी संघटनेने तर या लॉकडाऊनला सुरुवातीपासूनच विरोध केला होता आणि आता 23 तारखेनंतर तो पुढे वाढवण्यात आला तर त्या विरोधात आपण आंदोलन करू, असा इशारा व्यापाऱ्यांनी दिलाय.
या लॉकडाऊनचा मुख्य उद्देश कोरोना संसर्गाची समूह साखळी तोडणं हा असल्याचा दावा करण्यात आला होता. परंतु, मागील सात दिवसांमधील कोरोना रुग्णांची वाढलेली आकडेवारी पाहता ही साखळी तोडण्यात यश आलेलं नाही. मुळात समूह साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन हा पर्याय आहे का? याबद्दलच अनेक तज्ज्ञांना शंका आहे. लॉकडाऊनच्या या काळात सरकारी रुग्णालयांमधील व्हेंटिलेटर्स फुल्ल झाल्याचं चित्र आहे. ससून, नायडू किंवा कोणत्याही शासकीय रुग्णालयात व्हेंटिलेटर्स किंवा ऑक्सिजन बेड मिळत नाहीत आणि खाजगी हॉस्पिटल्स उभं करत नाहीत, अशी अवस्था पुणेकरांची झालीय.