केईएम रूग्णालयाचा निष्काळजीपणा, हात गमावलेल्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
मुंबई : केईएम रुग्णालयाच्या निष्काळजीपणामुळे हात गमवावा लागलेल्या प्रिन्स राजभर या चिमुरड्याचा शुक्रवार (22 नोव्हेंबर) पहाटे तीन वाजता दुर्दैवी मृत्यु झाला आहे. 7 नोव्हेंबरला ईसीजी मशीनमध्ये झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे गादी जळून झालेल्या अपघातात त्याचा कान आणि एक हात होरपळला होता. त्यामुळे कान आणि हात कापण्याची वेळ आली होती. याबाबतची माहिती केईएम हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. हेमंत देशमुख यांनी दिली आहे. नुकतेच या तीन महिन्याच्या मुलाला 10 लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचा निर्णय पालिकेच्या गटनेत्यांच्या बैठकीत घेण्यात आला होता. यातील पाच लाख रुपये त्याच्या नावावर मुदत ठेवीवर ठेवले जाणार होते, तर पाच लाख रुपये त्याच्या पालकांना उदरनिर्वाहासाठी दिले जाणार होते.
मूळच्या उत्तरप्रदेशच्या मऊ जिल्ह्यातील कबिराजपुरमध्ये राहणारे पन्नेलाल राजभर यांना अडीच महिन्यांपूर्वीच एक पुत्रप्राप्ती झाली. पण, प्रिन्सची तब्येत सतत खालावलेल्या अवस्थेत होती. त्यानंतर, कुटुंबियांना प्रिन्सच्या छातीत छिद्र असल्याचं कळलं. त्यामुळे कुटुंबीय बाळाला घेऊन मुंबईत दाखल झाले. त्यानंतर, उपचारांसाठी ते पालिकेच्या केईएम रुग्णालयात गेले. डॉक्टरांनी तपासणी करत बाळाला अॅडमिट करुन घेतलं. मध्यरात्री 2.50 वाजण्याच्या सुमारास बेडच्या बाजूला ऑक्सिजन आणि अन्य वायरमध्ये अचानक आग लागली. या आगीच्या घटनेमध्ये बाळाचा एक हात आणि एका बाजूचा चेहरा भाजला. त्यामुळेच प्रिन्सचा हात कापावा लागला.