केंद्राच्या निधीअभावी महामार्गाची कामे रखडली- सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण
नवी दिल्ली | महाईन्यूज
केंद्र सरकारने नियमित निधी न पुरवल्यामुळे राज्यातील राष्ट्रीय महामार्गाची अनेक कामे बंद पडली वा ती रखडली असल्याची टीका राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केली आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये कित्येक कोटींच्या रस्तेविकासाची कामे राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणाने हाती घेतली होती पण, त्यासाठी केंद्राने निधी पुरवला नाही तर कामे पूर्ण होणार कशी, असा सवाल करून अशोक चव्हाण म्हणाले की, राज्यातील राष्ट्रीय महामार्गाची दुरवस्था झालेली आहे. निधीअभावी कंत्राटदारांनी कामे बंद केलेली आहेत. प्राधिकारणाने महामार्ग विकासाची जबाबदारी घेतली असेल तर कामे वेळ पूर्ण करणे हे प्राधिकरणाचेच दायित्व आहे.
रखडलेल्या महामार्ग रस्त्यांची संख्या मोठी असून हा राजकीय विषय नाही. महाराष्ट्राच्या प्रगतीमध्ये केंद्राचीही मदत मिळायला हवी. केंद्रीय रस्ते-वाहतूक व महामार्ग विकास मंत्री नितीन गडकरी हे प्रगतीशील मंत्री मानले जातात. धडाडीने कामे करणारे मंत्री अशी त्यांची प्रतिमा चांगली आहे. पण, कामे बंद झाली ही वस्तुस्थिती आहे. महामार्ग विकासाची कामे तातडीने मार्गी लागली पाहिजेत, असे चव्हाण म्हणाले. गडकरी परदेश दौऱ्यावर असल्याने त्यांची भेटी झाली नाही पण, महामार्गाच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी पुन्हा दिल्ली दौरा करणार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले आहे.काही कामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याची तसेच, कंत्राटदारांना लोकप्रतिनिधींकडून त्रास दिला जात असल्याबद्दल चव्हाण म्हणाले की, एखादे प्रकरण गंभीर असेल तर गडकरींनी कारवाई करावी. राज्याच्या अखत्यारितील रस्ते बांधकामात भ्रष्टाचार झाला असेल तर राज्य सरकार कारवाई करेल पण, केंद्राच्या अखत्यारितील रस्त्यांबाबत केंद्राने कारवाई करावी, असे चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे.