काँग्रेस विधिमंडळ पक्षनेत्याची सोमवारी निवड
विरोधी पक्षनेता निवडीचा निर्णय विधानसभा अध्यक्षांवर अवलंबून
मुंबई : राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या काँग्रेस विधिमंडळ पक्ष नेतेपदी कोणाची वर्णी लागते याबाबत उत्सुकता आहे. सोमवारी आमदारांच्या बैठकीत ही निवड करण्यात येईल. काँग्रेसच्या गटनेत्याची विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्याचा निर्णय सर्वस्वी विधानसभा अध्यक्षांवर अवलंबून असेल.
विखे यांचे पुत्र सुजय यांनी अहमदनगर मतदारसंघातून भाजपतर्फे लोकसभा निवडणूक लढविल्याने विखे यांनी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा पक्षाकडे दिला होता. राहुल गांधी यांच्या शिर्डीतील सभेच्या आधी विखेंचा राजीनामा स्वीकारल्याचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी जाहीर केले होते. त्यांच्या राजीनाम्यामुळे विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेतेपद रिक्त झाले होते. सोमवारी काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक होणार असून, तीत नव्या गटनेत्याची निवड केली जाईल, असे चव्हाण यांनी सांगितले. या बैठकीला राज्याचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे उपस्थित राहणार आहेत.
नव्या गटनेत्याची निवड केल्यावर विधानसभा अध्यक्षांकडे पत्र सादर केले जाईल. त्यानंतर विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे याबाबत निर्णय घेतील. काँग्रेसने पत्र दिल्यावर लगेचच विरोधी पक्षनेत्याची निवड करण्याचे अध्यक्षांवर बंधनकारक नसते. संख्याबळाचा आढावा घेऊन अध्यक्ष निर्णय घेऊ शकतात.
विधानसभेत काँग्रेसचे ४२, तर राष्ट्रवादीचे ४१ आमदार निवडून आले होते. राष्ट्रवादीचे आमदार हनुमंत डोळस यांचे अलीकडेच निधन झाले. काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार यांनी राजीनामा सादर केला आहे. दोन राणे समर्थक आमदार तांत्रिकदृष्टय़ा काँग्रेसमध्ये आहेत.
के. सी. पाडावी, कुणाल पाटील हे काँग्रेस आमदार लोकसभा निवडणूक लढवीत असून, त्यांच्यापैकी कोणी निवडून आल्यास आमदारांचे संख्याबळ कमी होऊ शकते. विधानसभेची निवडणूक ऑक्टोबरमध्ये होणार असून, १७ जूनपासून विधानसभेचे अखेरचे अधिवेशन सुरू होत आहे. यामुळेच काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपद मिळू नये, असा सत्ताधारी भाजपचा प्रयत्न असेल.
कोण होणार गटनेता?
काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी कोणाची वर्णी लागते याबाबत पक्षात वेगवेगळे मतप्रवाह आहेत. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेस समितीच्या कार्यकारी समितीचे सदस्य बाळासाहेब थोरात, उपनेते विजय वडेट्टीवार, नसिम खान यांच्या नावांची चर्चा आहे. सोमवारच्या बैठकीत पक्षनेतृत्वाला अधिकार देणारा एक ओळीचा ठराव केला जाईल. त्यानंतर लोकसभा निकालानंतर नव्या गटनेत्याची निवड केली जाऊ शकते. लोकसभा निवडणुकीचा निकाल कसा लागतो यावरही बरीच समीकरणे अवलंबून असतील.