breaking-newsआंतरराष्टीय

कर्तारपूर मार्गिकेबाबत भारत- पाकिस्तानमध्ये मतभेद

पाकिस्तानातील गुरूद्वारा दरबार नानक साहिब व भारतातील डेराबाबा नानक या शीख धर्मस्थळांना जोडणाऱ्या कर्तारपूर मार्गिकेबाबत दोन्ही देशांच्या तंत्रज्ञांमध्ये काही मुद्दय़ांवर मतभेद झाले आहेत. रावी नदीच्या पूरपठारावर पूल बांधण्याच्या मुद्दय़ाचा त्यात समावेश आहे त्यामुळे कर्तारपूर मार्गिका प्रकल्पात अडथळे निर्माण झाले आहेत.

भारत व पाकिस्तान यांच्या तज्ज्ञांची बैठक कर्तारपूर झिरो पॉइंट येथे झाली त्यात या मार्गिकेतील काही प्रक्रिया पद्धतींवर चर्चा करण्यात आली. एक्स्प्रेस ट्रिब्यूनच्या वृत्तानुसार एक तासभर ही बैठक चालली होती. त्यात दोन्ही देशाच्या तंत्रज्ञ गटाचे प्रतिनिधी उपस्थित होते. भारताने या मार्गिकेअंतर्गत रावी नदीवर एक किलोमीटर लांबीचा पूल बांधण्याची सूचना केली असून पाकिस्तानने रस्ता बांधण्याचा प्रस्ताव मांडला आहे. भारतीय अधिकाऱ्यांनी रस्त्याच्या प्रस्तावास आक्षेप घेतला असून नदीला पूर आल्यास भाविकांना धोका आहे त्यामुळे पूल बांधणेच योग्य असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

रस्त्याची उंची जास्त ठेवून त्याच्या बाजूला धरण बांधता येईल असे पाकिस्तानी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. पुढील बैठकीच्या तारखेबाबत दोन्ही देशात मतैक्य होऊ शकलेले नाही. भारताकडून परराष्ट्र मंत्रालय, गृह मंत्रालय, भारतीय बंदरे प्राधिकरणे, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांचे अधिकारी उपस्थित होते.

पाकिस्तानच्या बाजूने संघराज्य तपास संस्था, सीमा शुल्क, रस्ते बांधणी, पाकिस्तानी रेंजर्स पंजाब, पाकिस्तान  सर्वेक्षण संस्था यांचे अधिकारी उपस्थित होते. याआधी एप्रिलमध्ये तंत्रज्ञ गटाची बैठक झाली होती त्यावेळी परराष्ट्र मंत्रालयाचे अधिकारीही सहभागी झाले होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button