करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिरात किरणोत्सव सोहळा सुरू
कोल्हापूर – साडेतीन शक्तिपीठां पैकी एक संपूर्ण पीठ आणि स्थापत्य शास्त्राचा अद्भुत नमुना असलेल्या करवीरनिवासिनी श्रीअंबाबाई मंदिरात वर्षातील दुसरा किरणोत्सव सोहळा रविवारी पासून सुरू झाला आहे. पहिल्या दिवशी खराब हवामानामुळे सूर्यास्ताची किरणे गाभाऱ्यापर्यंत पोहोचली नाहीत.
काल सोमवारी दुसऱ्या दिवशी सूर्याची किरणे देवीच्या चरणाला स्पर्श करुन लुप्त झाली होती. तर आज तिसऱ्या दिवशी मावळतीची किरणे कमरेपर्यंत पोहोचली. उद्या ही किरणे देवीच्या गळ्या पर्यंत तर पाचव्या दिवशी मुखापर्यंत पोहोचतील अशी माहिती प. महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी दिली.
किरणोत्सव सोहळा हा श्रीअबाबाईचा अनोखा सोहळा आहे. सूर्यास्तापूर्वी काही क्षण सूर्याची सोनेरी किरणे पहिल्या दिवशी देवीच्या चरणावर, दुसऱ्या दिवशी कमरेपर्यंत आणि तिसऱ्या दिवशी मुखकमलावर स्पर्श करतात. गेल्या दहा वर्षांपासून अनधिकृत बांधकाम तसेच खराब वातावरणामुळे या सोहळ्यात अडथळा येत होता. गेल्या वर्षी हा सोहळा पूर्णपणे झाला होता. सध्या पाच दिवस हा किरणोत्सव पाहिला जात आहे.