औषधांच्या कमाल किमतीमध्ये ५० टक्के वाढ
मुंबई | महाईन्यूज
बीसीजी लस, हिवताप, कुष्ठरोग इत्यादी आजारांवरील अत्यावश्यक २१ औषधांच्या कमाल किमतीमध्ये एकाच वेळी ५० टक्के वाढ करण्याचा निर्णय राष्ट्रीय औषध मूल्य निर्धारण प्राधिकरणाने (एनपीपीए) घेतलेला आहे. औषधांच्या नियंत्रित केलेल्या किमती वाढविण्याचे धोरण पहिल्यांदाचा ‘एनपीपीए’ने स्वीकारले आहे.सार्वजनिक आरोग्य क्षेत्रामध्ये अत्यावश्यक औषधांच्या किमती रुग्णाला परवडणाऱ्या दरात उपलब्ध व्हाव्यात आणि औषधनिर्मिती कंपन्यांनी अवाच्या सव्वा नफा कमावत रुग्णांची लूट करू नये, यासाठी ‘एनपीपीए’कडून औषधाच्या किमतीवर नियंत्रण आणत कमाल किंमत ठरविली जात आहे.
औषधांमधील मूळ घटकद्रव्ये, उत्पादन किंमत इत्यादी बाबींमध्ये वाढ झाल्याने औषधांच्या कमाल किमतीमध्येही वाढ करावी, अशी मागणी जवळपास ५० हून अधिक औषधनिर्मिती आणि विक्रेत्या कंपन्यांनी केलेली आहे. तसेच औषधांचे उत्पादन परवडत नसल्याने या औषधांचा तुटवडाही बाजारात काही प्रमाणात निर्माण होऊ लागला होता. त्यामुळे भविष्यात ही औषधे उपलब्ध होणार नाहीत, अशी गंभीर समस्या निर्माण होऊ नये यासाठी हा निर्णय घेतल्याचे ‘एनपीपीए’ने स्पष्ट केले आहे.