इस्त्रायली कंपनीची एअर इंडियाच्या संबंधातील याचिका मागे
जेरूसलेम – भारताच्या एअर इंडिया या विमान कंपनीच्या विमानाला सौदी अरेबिया मार्गे इस्त्रायल मध्ये येण्यास अनुमती देण्याच्या इस्त्रायल सरकारच्या निर्णयाला तेथील ईएलएआय या विमान कंपनीने तेथील उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. पण ही आव्हान याचिका कोर्टाच्या सूचनेनुसार संबंधीत विमान कंपनीने मागे घेतली आहे.
भारतातून इस्त्रायलला येणारी विमाने सौदी अरेबियाच्या आक्षेपामुळे आजवर अन्यत्र वळसा घालून तेथे येत असत. परंतु एक विशेष बाब म्हणून सौदी अरेबियांने भारतीय विमानांना इस्त्रायला जाण्यासाठी आपल्या देशाची हवाई हद्द वापरण्यास अनुमती दिली आहे. त्यामुळे या विमान प्रवासाचे हवाई अंतर बरेच कमी झाले आहे. त्याचा एअर इंडियाला नैसर्गिक मोठा लाभ होणार असल्याने दरांच्या लढाईत आमचे त्यात बरेच नुकसान होत असल्याची तक्रार करीत इस्त्रायली विमान कंपनीने आपल्याच सरकारच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.
सौदीच्या हवाई मार्गाने येणारे पहिले भारतीय विमान 22 मार्चला इस्त्रायलच्या विमानतळावर उतरले होते. त्यानंतर लगेच ईएलएआय या विमान कंपनीने ही आव्हान याचिका दाखल केली होती. परंतु सदर विमान कंपनीने कोर्टाच्या सूचनेनुसार ही याचिका मागे घेतली आहे. त्याचे नेमके कारण मात्र अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही.
दरम्यान भारत आणि इस्त्रायल यांच्यात जी थेट विमान सेवा सुरू करण्यात आली आहे त्याला मोठा प्रतिसाद मिळत असून ही विमान सेवा आता आठवड्यातून चार दिवस अशी करण्यात आली आहे. लवकरच ही विमान सेवा दैनंदिन स्वरूपातही उपलब्ध करून दिली जाणार आहे.