आयसीएमआर पथक परभणी जिल्ह्याच्या दौ-यावर शनिवारी दाखल
परभणी | देशातील कोरोना बाधित रूग्णांची दिवसेंदिवस वाढणारी संख्या ओळखून केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाद्वारे लोकसंख्येत कोरोना विषाणूचा संसर्ग कितपत घातक पातळीवर फैलावला, सामुदायिक संसर्ग म्हणजेच कोरोनाचा फैलाव तिस-या टप्प्यावर पोहोचला की काय, हे तपासण्याकरिता भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदद्वारे (आयसीएमआर) हे पथक परभणी जिल्ह्याच्या दौ-यावर शनिवारी दाखल झाले.
परभणी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात एक याप्रमाणे दहा गावांची निवड करण्यात आली असून या गावात जाऊन या पथकाने प्रत्येकी चाळीस याप्रमाणे चारशे सॅम्पल जमा केले आहेत. परभणी जिल्ह्यातील देऊळगाव, भोगाव, किनोळा, सोनपेठ, फरकंडा, पिंगळी आधी गावांना या पथकाने भेटी देऊन त्या ठिकाणचे सॅम्पल जमा केले आहेत. महाराष्ट्रातील नांदेड, बीड, परभणी, जळगाव आणि अहमदनगरसह देशातील 69 जिल्ह्यांत या पथकाद्वारे रँडम सर्वेक्षण केले जाणार आहे. आयसीएमआर अन्य संस्थांच्या साह्याने हे सर्वेक्षण होणार असल्याची माहिती शासकीय सूत्रांनी दिली. देशात महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आहेत. अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील कोरोना बळींची संख्याही जास्त जास्त असल्याचे समोर आले आहे याच पार्श्वभूमीवर केंद्र शासनाच्या आरोग्य विभागाने महाराष्ट्रातील सहा जिल्ह्यातील गावांना भेटी देऊन प्रत्येक जिल्ह्यातून चारशे सॅम्पल घेतली जाणार आहेत.