आमीर खानला पवारांचा “पाणी’मंत्र
अभिनेता आमिर खानने पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून राज्यात सुरू केलेले पाणलोटाचे कार्य एक सर्वसामान्यांची चळवळ बनले असून आमिरने या कामाविषयी माहिती देण्यासाठी आपल्या सहकाऱ्यांसह राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. आमिर खान आणि त्यांच्या टीमला शरद पवार यांनी ऍग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टला भेट देण्याचे निमंत्रण दिले होते.
आपल्या देशात ऋतूमान अनियमित असल्याने पाणी साठवण्याची योजना राबवणे अत्यावश्यक असून आमिर खानची टीम सर्वसामान्यांचा सहभाग घेऊन त्यांना पाणीसंवर्धनाच्या कामासाठी उद्युक्त करण्याचे कौतुकास्पद काम करत आहे. केवळ पिण्यासाठी पाणीसंवर्धन नाही तर 60 टक्के शेतीवर अवंलबून असलेल्या देशात शेतीसाठी पाण्याचा योग्यप्रकारे वापर करण्याचे प्रशिक्षण देणे गरजेचे असल्याचे शरद पवार यांनी सांगितले.
इस्राईलचे उदाहरण देत शरद पवार म्हणाले, त्यांनी पाण्याच्या अत्यल्प उपलब्धतेतही थेंब थेंब वाचवून शेतीचे नंदनवन फुलवले आहे. कमीत कमी पाण्यात जास्तीत जास्त पीक कसे घेता येईल यासाठी अनेक प्रयोग आपल्या ऍग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टमध्ये केले जातात. पाटातून सोडण्यात आलेले पाणी बरचसे वाया जाते, शिवाय त्यामुळे बिनकामाचे तणसुद्धा येतात. त्याऐवजी ऊसाच्या केवळ मुळांना मुबलक पाणी उपलब्ध होईल, अशी योजना केल्यास फायदेशीर ठरेल, असा सल्लाही त्यांनी दिला.