आमदार रमेश कदमांना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिलासा; हायकोर्टाकडून जामीन मंजूर
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे आर्थिक विकास महामंडळातील कोटय़वधीच्या घोटाळाप्रकरणी तुरुंगात असलेल्या आमदार रमेश कदम यांना आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिलासा मिळाला आहे. मुंबई हायकोर्टाकडून त्यांना तात्पूरता जामीन मंजूर करण्यात आला आहे. दरम्यान, ते या निवडणुकीत अपक्ष म्हणून लढण्याची शक्यता आहे.
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे आर्थिक विकास महामंडळातील ५१२ कोटी रुपयांचा घोटाळा समोर आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना निलंबित केले होते. दरम्यान, महिनाभर फरार असलेल्या कदमांना सीआयडीने पुण्यातील ग्रँड हयात हॉटेलमधून ताब्यात घेतले होते. त्यानंतर कोर्टाच्या आदेशाने त्यांची मुंबईच्या ऑर्थर रोड मध्यवर्ती कारागृहात रवानगी झाली होती.
दरम्यान, भाजपाला पाठींबा जाहीर करण्यामुळे तसेच तुरुंगात पोलीस कर्मचाऱ्याला दमबाजी अशा प्रकरणांमुळे ते अनेकदा चर्चेत राहिले आहेत. यापूर्वी अनेकदा त्यांनी कोर्टात जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र, आज हायकोर्टाने त्यांचा जामीन मंजूर केला. केवळ निवडणुकीच्या काळापुरताच तात्पुरत्या स्वरुपाचा हा जामीन आहे.
मोहोळचे राष्ट्रवादीचे निष्काषित आमदार असलेले रमेश कदम हे तत्कालीन आघाडी सरकारच्या काळात लोकशाहीर अण्णा भाऊ साठे आर्थिक विकास मंडळाचे अध्यक्ष होते. परंतू बोगस कर्जे मंजूर करून कोटय़वधींचा अपहार केल्याचा घोटाळा उजेडात आल्यानतंर त्यात आमदार कदमांचाही थेट संबंध असल्याने त्यांच्याविरुद्ध मुंबईत दहिसर पोलीस ठाण्यात सर्वप्रथम गुन्हा दाखल झाला होता. सुमारे ५१२ कोटींच्या घोटाळ्यात ते आतापर्यंत न्यायालयीन कोठडीत होते.