आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकऱ्यांच्या न्यायासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा करणार – ना. डॉ. नीलम गोऱ्हे
थेट ग्राहक आठवडे बाजार केंद्राचे ना. डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते उद्घाटन
पुणे | प्रतिनिधी
लॉकडाऊन काळात शेतकरी बांधवांनी खूप छान काम केले. शेतीतला ताजा आणि स्वच्छ माल थेट शेतकरी ते ग्राहकांन पर्यंत पोचवण्याची व्यवस्था लॉकडाऊन काळात अधिक मजबूत झाली. त्याच व्यवस्थेला अजून उत्तम वळण देण्यासाठी ही आठवडी बाजार संकल्पना नक्कीच कारणीभूत ठरेल. १ मार्च पासून चालू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकऱ्यांना न्याय मिळेल या अनुषंगाने जे जे करता येईल ते करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न असेल आणि त्यासाठी विधिमंडळात आम्ही त्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे असे प्रतीपादन विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले.
विंग्रो फार्मर प्रोड्यूसर कंपनी लिमिटेड द्वारा आयोजित शेतकरी ते थेट ग्राहक आठवडे बाजार विक्री उत्तम नगर, बावधन बुद्रूक येथील केंद्राचे उद्घाटन ना.डॉ. गोऱ्हे नीलम यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी त्या बोलत होत्या.
शिवसैनिक सचिन दगडे व मच्छिंद्र दगडे यांच्या संकल्पनेतून सुरू केलेल्या या आठवडे बाजारच्या उद्घाटन सोहळ्या प्रसंगी सत्यवान उभे (संपर्क प्रमुख), संजय मोरे (शहर प्रमुख), स्वाती ढमाले (पुणे, संपर्क संघटीका), सरपंच पियुषा दगडे, नगरसेवक किरन दगडे, पोलिस पाटील बबनराव दगडे आदि मान्यवर तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, शेती उत्पादनाला योग्य भाव मिळावा, यासाठी आपल्या सारख्या कंपन्या असे अनेक उपक्रम राबवत आहेत. तो कौतुकास्पद आहे. सेंद्रिय फार्म द्वारे चालू असलेले काम देखील महत्त्वपूर्ण आहे. पुण्यात चालू केलेल्या ‘ताईचा डबा’ या संकल्पनेचा देखील अनेकांना लाभ व अनेक महिलांना रोजगार उपलब्ध झाला आहे, असे डॉ.गोऱ्हे म्हणाल्या.
सचिन दगडे म्हणाले, भाजीपाल्या साठी परिसरातील नागरिकांना दुर जावे लागायचे या समस्येवर तोडगा म्हणून आम्ही शेतकरी ते थेट ग्राहक उपक्रमातून हा आठवडे बाजार सुरू केला आहे. यामध्ये सर्व प्रकारच्या ताजा भाजीपाला, सर्व प्रकारची फ्रेश फळे, नमकीन, म्हसाले योग्य व रास्त दरात उपलब्ध असणार आहे. हा बाजार दर शनिवारी दुपारी ३ ते रात्री ९ पर्यंत ग्राहकांनसाठी खुला असणार आहे.