अनोखी वटपौर्णिमा: अजन्म एकाच पत्नीसाठी नवी सांगवीतील पुरुषांनी वडाला घातले सात फेरे
पिंपरी – पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून कोणत्याही क्षेत्रात महिला कर्तव्य बजावित आहेत. आता पुरूष-महिला भेद कायमचा नष्ट होण्यासाठी मानवी हक्क संरक्षण आणि जागृतीच्या वतीने अनोखी वटपौर्णिमा साजरी केली. संस्थेच्या पुरुषांनी जन्मोजन्मी हीच पत्नी मिळावी, अशी इश्वरचरणी याचना करत वडाच्या झाडाला सात फे-या मारून वटपौर्णिमा साजरी केली.
नवी सांगवी येथे मागील तीन वर्षांपासून ही अनोखी वटपौर्णिमा मानवी हक्क संरक्षण आणि जागृतीच्या वतीने साजरी करण्यात येते. पत्नीला वटवृक्षाप्रमाणे दीर्घायुष्य लाभावे आणि हीच पत्नी जन्मोजन्मी मिळावी, यासाठी वडाच्या झाडाला फे-या मारत त्याची पूजा करण्यात आली. यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष विकास कुचेकर, पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष आण्णा जोगदंड, उपाध्यक्ष विकास शहाणे, संगीता जोगदंड, अॅड. सचिन काळे, सामाजिक कार्यकर्ते अरूण पवार, अरविंद मांगले, वसंतराव चकटे, पी. पी. पिल्ले, मुरलीधर दळवी, हनुमंत पंडित, दीपक शहाणे, गजानन धाराशिवकर, दत्तात्रय घोरपडे, अदिती निकम, शिवानंद तालकोटी, आप्पाजी चव्हाण, जीवन धवन, सतीश धावडे आदी उपस्थित होते.
भारतीय संस्कृतीमध्ये वटपौर्णिमेला अनन्यसाधारण महत्व आहे. या दिवशी सर्व महिला आपल्या पतीसाठी वटवृक्षाला सात फे-या मारतात. त्याला सूत गुंडाळले जाते. पुराणातील कथेप्रमाणे सावित्रीने सत्यवानाला यमाच्या दारातून परत आणले होते. या कथेचे स्मरण करून वटवृक्षाची पूजा करून सौभाग्य मागण्याचा हा दिवस म्हणून साजरा केला जातो. पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली जाते. आपल्या देशात पुरुषप्रधान संस्कृती आहे, असे म्हटले जाते. परंतु, ही संस्कृती अपवाद वगळता देशातून हद्दपार झाली आहे. त्यामुळे पुरुषांनी देखील आपल्या पत्नीसाठी अशा प्रकारचे सण साजरे केले तर त्यात वावगे काहीही नाही, असे शहराध्यक्ष आण्णा जोगदंड यांनी सांगितले. यावेळी संस्थेच्या वतीने सहभागी सर्वांना प्लास्टिक न वापरण्याची व पर्यावरण जनजागृतीची शपथ देण्यात आली.