काळेवाडी, थेरगावात गढूळ पाणी पुरवठा ; नगरसेवकांचेही दुर्लक्ष
पिंपरी ( महा ई न्यूज ) – महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्या अधिका-यांचा भोंगळ कारभार वारंवार समोर येत असून त्यांचा फटका नागरिकांना बसत आहे. त्यामुळे तांत्रिक कारणाने पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येतो. परंतू, त्यानंतर सोडलेले पिण्याचे पाणी गढूळ येवू लागले आहे. हे गढूळ पाणी नागरिकांनी प्यायचे का? असा सवाल नागरिक विचारत आहेत. दरम्यान, याकडे तेथील नगरसेवकांनीही दुर्लक्ष केल्याने नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागातील अधिकारी हे अचानकपणे तांत्रिक कारणे देवून दुरुस्तीच्या कामासाठी पाणी पुरवठा बंद ठेवत आहे. हा निर्णय अधिकारी अचानक घेवून त्यांचे अचानक प्रसिध्दीकरण केले जाते. यावर नागरिकांकडून सोशल मीडियातून नाराजी व्यक्त होत आहे. यामध्ये सन्माननियांनो, पाणीपुरवठ्याच्या तातडीने असणाऱ्या अडचणी, ह्या पाणी येण्याच्या दोन मिनिटं आधी सांगण्यापेक्षा कमीत कमी दोन दिवस आधी सांगत जावा, तसेच कमीत कमी सर्वसामान्य नागरिकांची गैरसोय होणार नाही, याकडेही लक्ष द्या. महापालिकेचा कारभार भोंगळ असतोच पण लोकप्रतिनिधींनी याविषयी तत्पर असावे, एवढीच माफक अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत. याशिवाय पिण्याचे पाणी महिन्यातून 10 दिवस तरी गढूळ येतं. त्यामुळे गढूळ पाणी नागरिकांनी प्यावे लागत आहे. याकडे तुम्हाला वेळ भेटला तर जरा तिकडंही लक्ष द्या, आमच्यावर तुमचे खुप उपकार होतील. अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत.