जम्मू-काश्मीरला जाणारे बीएसएफचे 9 जवान बेपत्ता
चंदौली (उत्तर प्रदेश) – खास ट्रेनने जम्मू-काश्मीरला जाणारे बीएसएफचे 9 जवान वाटेतच बेपत्ता झाल्याची माहिती देण्यात आली आहे. हे सर्व जवान बंगालमधून ड्यूटीसाठी जम्मू-काश्मीरला जात होते. 9 पैकी 1 जवान वर्धमान येथे, तर 8 जवान धनबाद येथे बेपत्ता झाले.
बीएसएफच्या जवानांची तुकडी ड्यूटीसाठी बंगालहून जम्मू-काश्मीरला जात होती. प्रवासात त्यांच्यापैकी 9 जवान गायब झाल्याचे उघड झाले आहे. ट्रेन वर्धमान जंक्शनला थांबली, तर बटालियनचा एक जवान-प्रदीप कुमार सिंह हा गायब असल्याचे उघड झाले. पुढील स्टेशनला धनबाद येथे ट्रेन थांबली तेव्हा कैलाश कुमार, दीपक कुमार, दीपक सिंह, अमित कुमार, चौवन सिंह, अश्विनी कुमार, रोहित वर्मा आणि गोविंद टोली गैरहजर असलेले दिसले.
ट्रेन मुगल सराय येथे पोहचल्यावर प्लाटून कमांडर शिव सिंह आणि सुखवीर सिंह यांनी जीआरपी ठाण्यात जाऊन इन्स्पेक्टरला घडलेली घटना सांगितली.
बीएसएफच्या गायब झालेल्या जवानांची तक्रार दोन्ही कमांडर्सनी संयुक्तपणे नोंदवली असून त्या आधारे कारवाई सुरू करण्यात आली असल्याची माहिती जीआरपीचे उप निरीक्षक राजेश कुमार यांनी दिली आहे.