पुणे, नगर व सोलापूर जिल्ह्यांना वरदान ठरलेल्या उजनी धरणाने सध्या शंभरीचा टप्पा ओलांडला
इंदापूर:पुणे, नगर व सोलापूर जिल्ह्यांना वरदान ठरलेल्या उजनी धरणाने सध्या शंभरीचा टप्पा ओलांडला आहे. धरणात सध्या ११८.६६ टीएमसी एकूण पाणीसाठा झाला आहे. सध्या धरणाच्या १६ दरवाजांतून ४१ हजार ६०० क्युसेकने नदीपात्रात पाणी सोडण्यात येत आहे. प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
वीजनिर्मिती केंद्रासाठीही धरणातून पाणी सोडण्यात येत आहे. पुण्यातील धरणे भरल्याने भीमा नदी सध्या दुथडी भरून वाहत असून, दौंडमधून ५६ हजार २८३ पेक्षा जास्त क्युसेकने उजनी पात्रात पाणी येत आहे. यामुळे रात्रीच्या वेळी उजनी धरणातून विसर्ग वाढविण्याची शक्यता आहे. सोलापूर, नगर, पुणे जिल्ह्यातील शेती, उद्योगांसह नागरिकांची तहान भागविण्यात उजनी धरणाचा सर्वाधिक वाटा आहे. उस्मानाबाद शहरालाही उजनीतून पाणीपुरवठा केला जातो.
सध्या धरणातून नदीपात्रासह सीना-माढा उपसा सिंचन योजनेतून २५९ क्युसेकने विसर्ग सुरू आहे. भीमा-सीना जोड कालव्यातून (बोगदा) ८०० क्युसेकने सीना नदीत पाणी सोडण्यात येत आहे. मुख्य कालव्यातून दोन हजार क्युसेक्सने पाणी सोडण्यात येत आहे.
धरणाची पाणी साठवण क्षमता
११८.६६ टीएमसी
उपयुक्त पाणीसाठा
५५.०० टीएमसी
मृत पाणीसाठा
६३.६६ टीएमसी
डिंभे धरण ‘ओव्हरफ्लो’
आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर वाढल्याने डिंभे धरण शुक्रवारी शंभर टक्के भरले. साडेतेरा टीएमसी पाणी साठवण क्षमता असणान्या डिंभे धरणातून सध्या २५२० क्युसेकने घोड नदीपात्रात विसर्ग सुरू आहे. पाऊस सुरूच राहिल्यास विसर्ग वाढविण्यात येऊ शकतो, अशी माहिती पाटबंधारे विभागाकडून देण्यात आली. डिभ धरण आंबेगाव तालुक्यातील घोड नदीवर उभारण्यात आले आहे.
तालुक्याच्या आदिवासी भागात दर वर्षी मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो. हे सर्व पाणी थेट डिंभे धरणात जमा होते. डिंभे धरणाचे पाणलोट क्षेत्र असणाऱ्या आदिवासी भागात पावसाचा जोर वाढला आहे. धरणातून २५२० कुसेकने पाणी सोडण्यात आले असून, नदीकाठच्या गावांना दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. असे कुकडी प्रकल्पाचे उपअभियंता तानाजी चिखले यांनी सांगितले.