देशात शरिया कायदा नाही; हिंदूंना टार्गेट केल्यास, जशास तसं उत्तर, नितेश राणे आक्रमक
मुंबई : अमरावतीमधील उमेश कोल्हे हत्या प्रकरणावरुन भाजप नेते नितेश राणे चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. देशात शरिया कायदा लागू झालेला नाही, जर हिंदूंना टार्गेट करण्याचा प्रयत्न केलात, तर आम्ही जशास तसं उत्तर देऊ, असा इशारा राणेंनी दिला. मुंबईत पत्रकार परिषद घेत त्यांनी आपली भूमिका मांडली. मात्र दीपक केसरकर यांनी केलेल्या आरोपांविषयीच्या प्रश्नांना नितेश राणेंनी बगल दिली.
नुपूर शर्मा यांचं समर्थन केल्याने अमरावतीत उमेश कोल्हे यांची हत्या झाली, भाजप नुपूर शर्मा यांच्या वक्तव्याचं समर्थन करत नाही, अहमदनगरच्या कर्जतमध्येही एका तरुणाला धमकावून टोळक्याने कोल्हे हत्या प्रकरणाची पुनरावृत्ती करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप नितेश राणे यांनी केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेला तरुण जीवन मृत्यूशी झुंज देत आहे. त्याची भेट घेऊन त्याला सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन राणेंनी दिलं.
आता महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार राहिलं नाही, अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक राहिलेले नाहीत, हिंदूंना टार्गेट केलंत, तर जशास तसं उत्तर आम्हालाही देता येतं, असा स्पष्ट संदेश मला द्यायचाय, असं नितेश राणे म्हणाले.
आमच्या देवी देवतांची विटंबना केली, तरी आम्ही लोकशाही मार्गाने उत्तर देतो, मात्र एकालाही जीवे मारल्याचं ऐकलंय का? पण तुम्ही तशी पावलं उचलत असाल, तर आम्हालाही आमच्या लोकांच्या रक्षणासाठी उत्तर द्यावं लागेल, हिंदूंना तिसरा डोळा उघडावा लागेल, आमच्या लोकांना हात लावण्याचा प्रयत्न करु नका, असा खुला संदेश द्यायचा असल्याचं नितेश राणे म्हणाले.