देशाचा इतिहास बदलू पाहणाऱ्यांविरोधात महाराष्ट्रातील तरूण लढा देतील : कन्हैया कुमार
![The youth of Maharashtra will fight against those who are trying to change the history of the country: Kanhaiya Kumar](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/06/देशाचा-इतिहास-बदलू-पाहणाऱ्यांविरोधात-महाराष्ट्रातील-तरूण-लढा-देतील.jpg)
पुणे : ‘प्रत्येक परिस्थितीत आणि काळात महाराष्ट्राने नेहमीच देशाला दिशा देण्याचे काम केले. सामाजिक न्याय आणि समतेबरोबरच देशाला संविधान या राज्याने दिले. सध्या सत्तेसमोर सगळेच नतमस्तक होत असताना देशाचा इतिहास बदलू पाहणाऱ्यांविरोधात महाराष्ट्रातील तरुण लढा देण्याचे काम करील,’ अशी अपेक्षा काँग्रेसचे युवा नेते कन्हैया कुमार यांनी व्यक्त केली.
‘कनेक्ट महाराष्ट्र कॅन्क्लेव्ह २०२२’निमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात ‘लोकतंत्र’ या विषयावर कुमार बोलत होते. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत, आमदार रोहित पवार या वेळी उपस्थित होते. या वेळी राज्यातील तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कन्हैया कुमार यांनी केंद्रातील मोदी सरकारवर टीका करताना पुरोगामी महाराष्ट्रातील तरुणांनी देशाला दिशा दाखवावी, असे आवाहन केले. कन्हैया कुमार म्हणाले, ‘लोकशाहीच्या माध्यमातून सत्तेवर येऊन एकाधिकारशाही निर्माण केली जात आहे. प्रश्न विचारला, की तुम्हाला देशद्रोही ठरविले जात आहे. इतिहास बदलण्याचे काम होत आहे. महागाई, बेरोजगारी या समस्यांवर बोलायला कोणीही तयार नाही. प्रश्न विचारण्याचा तुमचा अधिकार तुम्ही जिवंत ठेवा.’