उर्वरित ८० ठिकाणांची कामे सन २०२३च्या पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे नियोजन
![The remaining 80 places are planned to be completed before the monsoon of 2023](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/07/The-remaining-80-places-are-planned-to-be-completed-before-the-monsoon-of-2023.jpg)
मुंबई: यंदाच्या पावसाळ्यापूर्वी मुंबईतील पाणी तुंबण्याच्या ३८६ ठिकाणांपैकी ३०६ जागी आवश्यक त्या उपाययोजना केल्या आहेत. त्यामुळे या ठिकाणी पाणी साचण्यापासून सुटका झाली असल्याचा दावा महापालिकेने केला आहे. उर्वरित ८० ठिकाणांची कामे सन २०२३च्या पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती पालिकेच्या वतीने देण्यात आली.
पावसाळ्यात मुंबईत पाणी तुंबण्याची समस्या दरवर्षी निर्माण होते. नालेसफाई, पर्जन्यजल वाहिन्यांची सफाई आणि डागडुजी आणि इतर उपाययोजना केल्यानंतरही पाणी साचण्याचे प्रमाण काही कमी होताना दिसत नाही. दरवर्षी नवीन पाणी साचण्याच्या जागा निर्माण होत असल्याने पालिकेची डोकेदुखी वाढते आहे. दरवर्षी पावसाळ्यात खड्डे आणि पाणी तुंबण्याच्या समस्येवरून मुंबईकरांच्या टीकेला सामोरे जावे लागते आहे. ही बाब लक्षात घेऊन प्रशासनातर्फे गेल्या काही वर्षांपासून पावसापूर्वी उपाययोजना हाती घेतल्या जात आहेत.
यंदाच्या पावसाळ्यात पाणी साचण्याची संभाव्य सुमारे ३८६ ठिकाणे होती. यापैकी २८२ ठिकाणी पाण्याचा निचरा करणाऱ्या उपाययोजना पालिकेने यापूर्वीच केल्या आहेत, तर उर्वरित १०४पैकी २४ ठिकाणांची कामे ३१ मे २०२२ पूर्वी पूर्ण करण्यात आली. आजवर ३०६ ठिकाणांची पावसाळी पाण्याच्या समस्येपासून सुटका झाली आहे, असा दावा प्रशासनाने केला आहे. बोरिवलीत डी. एन. म्हात्रे रोड हा त्यापैकी एक आहे. मुंबईच्या भौगोलिक रचनेत अनेक सखल परिसरांचा समावेश आहे. अत्यंत जोरदार पावसात तसेच विशेषतः पाऊस सुरू असताना समुद्राला भरती असेल तर सखल भागांमध्ये पाणी साचते. ही समस्या सोडवण्यासाठी पालिकेने पंपिग स्टेशनची बांधणी केली आहे. त्याचा उपयोग झाला असल्याचे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
बोरिवलीतील डी. एन. म्हात्रे रोड परिसरातील रहिवाशांना पावसाळ्यात अडचणींचा सामना करावा लागत होता. तसेच या भागातील वाहतुकीवरदेखील विपरित परिणाम होत होता. या रस्त्यावर एक्सर गुरुकृपा सोसायटीलगत बशीच्या आकाराचा भाग असल्याने आणि एक्सर पालिका शाळेजवळ पर्जन्य जलवाहिन्यांना अडथळा असल्याने पावसाळी पाण्याचा निचरा लवकर होत नसल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले. ही समस्या दूर करण्यासाठी म्हात्रे रस्त्याला लागून देवीदास मार्गावरील ओम शांती चौक ते एक्सर रस्त्यावरील लहान नाल्यापर्यंत चौकोनी आकाराची नवीन पर्जन्य जलवाहिनी बांधण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार पूर्वीची ०.६ मीटर आकाराची पर्जन्यजल वाहिनी बदलून नवीन १.५ चौरस मीटर आकाराची व सुमारे ४६५ मीटर लांबीची पर्जन्यजल वाहिनी बांधण्याचे काम हाती घेऊन ते ३१ मे २०२२च्या आधी पूर्ण करण्यात आले. या कामासाठी सुमारे २ कोटी ८५ लाखांचा खर्च झाला आहे.
सकारात्मक परिणाम
नवीन आणि अधिक क्षमतेच्या पर्जन्य जलवाहिन्या यासारख्या उपाययोजना मागील काही वर्षांपासून केल्या आहेत. हिंदमाता, गांधी मार्केट यासारख्या भागांमध्ये जोरदार पावसामुळे हमखास साचणारे पाणी साठवण जलाशयांमध्ये साठवून त्याचा नंतर उपसा करण्याचा प्रकल्पदेखील यशस्वी ठरला असून त्याचे सकारात्मक परिणाम मुंबईकरांना दिसत असल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी दिली.