मराठा समाजाला ईडब्ल्यूसी देण्याच्या आघाडी सरकारचा निर्णय उच्च न्यायालयाने रद्द
![The High Court quashed the decision of the coalition government to grant EWC to the Maratha community](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/07/The-High-Court-quashed-the-decision-of-the-coalition-government-to-grant-EWC-to-the-Maratha-community.png)
सांगली : मराठा समाजाला ईडब्ल्यूसी देण्याच्या आघाडी सरकारचा निर्णय उच्च न्यायालयाने रद्द केला आहे. यावरून भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि अजित पवारांच्यावर निशाणा साधला आहे. काका-पुतण्यांना गरीब मराठा समाजाचं भलं होऊ द्यायचं नाहीये, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे, अशा शब्दात गोपिचंद पडळकर यांनी शरद पवार आणि अजित पवारांवर निशाणा साधला आहे.
‘एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने पवार काका-पुतण्याच्या पोटात कळा उठत आहेत आणि म्हणूनच ते आता इकडे-तिकडे बोंबा मारत फिरतायत’, अशी टीका पडळकरांनी केली आहे. ते आटपाडीच्या झरे इथे बोलत होते.
आमदार पडळकर म्हणाले की, ‘मराठा समाजाला पूर्वलक्ष्यी प्रभावाने ews चा लाभ देण्याचा ठाकरे – पवार सरकारमधील निर्णय उच्च न्यायालयाने रद्द केला आहे. मी त्याच वेळेस सांगत होतो की, कायद्यामध्ये पूर्वलक्ष्यी प्रभावाने काही देता येत नाही. आता पुन्हा एकदा सिद्ध झाले की, काका-पुतण्यांना गरीब मराठा समाजाचं भलं होऊ द्यायचं नाही. त्याचप्रमाणे काका पुतण्याचं हे दुखः आहे की, मुळात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांनी कुठल्याही घराणेशाहीला संधी न देता एका साध्या मराठा कुटुंबातील एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदाची संधी दिली, म्हणून यांच्या पोटात कळा उठतायेत आणि म्हणूनच ते आता इकडे तिकडे बोंबा मारत फिरतायेत.’
इतकंच नाहीतर ‘गरीब मराठा समाजाचं भलं करण्यापेक्षा यांना आपल्याच पै पाव्हण्यांचं भलं करायचंय. हीच यांची खरी वृत्ती बाकी सगळ्या आपुलकीच्या भूलथापा’ असल्याची टीका पडळकरांनी पवारांवर टीका केली. दरम्यान, त्यांच्या या टीकेवर आता राष्ट्रवादीतून काय प्रतिक्रिया येणार हे पाहणं महत्त्वाचं आहे.