शिंदे-फडणवीस सरकारचं खातेवाटपाचं पहिलं गुपित फुटलं?
![shinde fadanvis](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/08/शिंदे-फडणवीस-सरकारचं-खातेवाटपाचं-पहिलं-गुपित-फुटलं-त्या-भेटीमुळे-जोरदार-चर्चा.jpg)
मुंबई: शिंदे-फडणवीस सरकारचा पहिलावहिला मंत्रिमंडळ विस्तार पार पडल्यानंतर आता सगळ्यांना खातेवाटपाची उत्सुकता लागली आहे. मात्र, एक-दोन खात्यांच्या मुद्द्यावरून एकमत न झाल्यामुळे खातेवाटप रखडला आहे. शिंदे गट आणि भाजपच्या गोटात कोणतं खातं कोणाला मिळणार, याबाबत अजूनही गुप्तता बाळगण्यात आली आहे. परंतु, शुक्रवारी पुण्यात झालेल्या एका भेटीनंतर नव्या सरकारच्या खातेवाटपाचं पहिलं गुपित उघड झाल्याचे बोलले जात आहे. भाजपचे खासदार उदयनराजे भोसले हे आज पुण्यात मंत्री दीपक केसरकर यांच्या भेटीला आले होते. (Mahrashtra govt Cabinet portfolios)
या भेटीनंतर उदयनराजे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी मी महाबळेश्वर, कास पठार आणि कोयना परिसरातील पर्यटन प्रकल्पांच्यादृष्टीने दीपक केसरकर यांची भेट घेतल्याचे उदयनराजे भोसले यांनी म्हटले. महाबळेश्वर हे जागतिक पातळीचे पर्यटनस्थळ आहे. दरवर्षी महाबळेश्वरला तब्बल ५० लाख पर्यटक भेट देतात. पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार कसा उपलब्ध करून देता येईल, याबाबतच्या योजनांवर आमची चर्चा झाली. येथील विकासकामांसंदर्भात मी त्यांची भेट घेतल्याचे उदयनराजे भोसले यांनी सांगितले. खातेवाटप होण्यापूर्वीच उदयनराजे भोसले पर्यटन खात्यांशी संबंधित प्रश्न घेऊन दीपक केसरकर यांच्याकडे का पोहोचले, असा प्रश्न त्यामुळे उपस्थित झाला. त्यामुळे दीपक केसरकर हेच शिंदे-फडणवीस सरकारचे नवे पर्यटनमंत्री असणार, अशी अटकळ बांधली जाऊ लागली आहे.
यावर प्रसारमाध्यमांनी उदयनराजे भोसले यांना तसा प्रश्नही विचारला. तेव्हा उदयनराजे यांनी सावधपणे बाजू सावरली. त्यांनी म्हटले की, दीपक केसरकर हे सावंतवाडी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. माझे आजोळही सावंतवाडीला आहे. मी लहानपणापासूनच तिकडे जातो. महाविद्यालयीन जीवनपासून मी दीपक केसरकर यांना ओळखतो. साताऱ्याप्रमाणे सावंतवाडीही पर्यटनाच्यादृष्टीने महत्त्वाचे आहे. त्यामुळे पर्यटनक्षेत्राचा विकास करताना त्या त्या क्षेत्रातील स्थानिक लोकप्रतिनिधींशीही चर्चा करणे आवश्यक आहे. त्यामुळे मी दीपक केसरकर यांची भेट घेतल्याचे उदयनराजे भोसले यांनी सांगितले.
जातपात नको, ससरकट आरक्षण द्या: उदयनराजे भोसले
यावेळी उदयनराजे भोसले यांनी मराठा आरक्षणासंदर्भातही सविस्तरपणे भाष्य केले. मी जातपात मानत नाही. हे जातपात करण्यापेक्षा सरसकट सर्वच जातीमधील आर्थिक दुर्बलांना आरक्षण दिले पाहिजे. आपल्याकडे पूर्वी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांची व्याख्याच चुकीची केली आहे. त्याचा फटका सर्वांना बसत आहे. व्यक्ती कुठल्याही जातीमधील असू दे ना, दुर्बल घटकांना सरसकट सवलती द्या ना. तुम्ही फक्त मागासवर्गीयांनाच आरक्षण का देता, असा सवाल उदयनराजे भोसले यांनी उपस्थित केला.