खडकवासला धरणातून होणारा विसर्ग वाढला; प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांनी दक्षता घ्यावी, दिला सतर्कतेचा इशारा
![The discharge from Khadakwasla dam increased; The administration has warned the citizens of Deekath to be vigilant](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/07/The-discharge-from-Khadakwasla-dam-increased-The-administration-has-warned-the-citizens-of-Deekath-to-be-vigilant.jpg)
पुणे : पुणे शहर आणि परिसरात सुरू असलेल्या पावसामुळे शहरालगतच्या विविध धरणांमधील पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. खडकवासला धरणाच्या सांडव्यातून सुरू असलेला विसर्गही वाढवून दुपारी १२ वाजता ५९९२ क्युसेक करण्यात आला आहे. पावसाच्या प्रमाणानुसार विसर्ग पुन्हा कमी किंवा जास्त केला जाण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर नदीकाठच्या नागरिकांनी दक्षता घ्यावी, असं आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आलं आहे.
मागील काही दिवसांपासून राज्यभरात पावसाचा धुमाकूळ सुरू आहे. मराठवाड्यासह कोकणातील अनेक जिल्ह्यांमध्ये तर पूरस्थिती निर्माण झाली आहे. अशातच पुणे जिल्ह्यात चार प्रमुख धरणांच्या परिसरात गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या संततधारेमुळे समाधानकारक पाणीसाठा झाला आहे. मागील महिन्यात पावसाने ओढ दिल्याने कोरडी पडलेली धरणे भरू लागली असून, ८.१९ अब्ज घनफूट (टीएमसी) म्हणजे गेल्या वर्षीच्या पाणीसाठ्याच्या तुलनेत अवघा ०.४७ टीएमसी पाणी कमी आहे. खडकवासला धरण सुमारे ७५ टक्क्यांहून अधिक भरले आहे.
खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात पाणी सोडण्यात येत असल्याने नदीकाठच्या नागरिकांना सावध राहण्याचा इशारा जलसंपदा विभागाने दिला आहे.
सोमवारी किती पाऊस झाला?
पुण्यात सोमवारी सकाळी ८ वाजल्यानंतर पावसाचे प्रमाण आणखी वाढले होते. दिवसभरात खडकवासला धरण परिसरात २२ मिलिमीटर, पानशेत धरण भागात ८४ मिलिमीटर, वरसगाव आणि टेमघर धरण क्षेत्रात अनुक्रमे ७५ आणि ६० मिलिमीटर पाऊस पडला. त्यानंतरही संततधार कायम राहिल्याने खडकवासला धरण हे सुमारे ७५ टक्के भरले होते.