मुंबई आणि ठाण्याच्या विकासात आणि विशेषतः मुंबईला देशाची आर्थिक राजधानी बनवण्यात राजस्थानी-गुजराती समाजांचे योगदान उल्लेखनीय : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी
![The contribution of Rajasthani-Gujarati communities in the development of Mumbai and Thane and especially in making Mumbai the financial capital of the country is remarkable: Governor Bhagat Singh Koshyari](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/07/Bhagat-Singh-Koshyari.jpg)
पुणे : मुंबई आणि ठाण्याच्या विकासात आणि विशेषतः मुंबईला देशाची आर्थिक राजधानी बनवण्यात राजस्थानी-गुजराती समाजांचे योगदान उल्लेखनीय आहे, असे वक्तव्य महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलं होतं. या वक्तव्यानंतर आता राज्यपालांवर चौफेर टीका होत आहे. शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी देखील सडकून टीका केली आहे. शिवसेनेचा झेंडा हीत घेऊन अवघे दोन दिवस झाले असतानाच अंधारेंनी राज्यपालांवर घणाघात केला.
काय म्हणाल्या सुषमा अंधारे?
“राज्यपाल हे राज्याचे पालक असतात. अन पालकाने राज्याप्रती पूर्वग्रहदूषित दृष्टिकोन किंवा आकस बुद्धी न ठेवता ममत्ने राज्याचे संगोपन करणे ही संविधानिक जबाबदारी आहे. परंतु महामहीम कोश्यारीजी यांच्याकडून इतक्याही जास्त अपेक्षा ठेवू नयेत. कारण राज्यापेक्षाही भाजप सांभाळण्याची जबाबदारी त्यांच्यावर अधिक आहे. चला महाराष्ट्र धर्म वाचवण्याची, जपण्याची आणि वाढवण्याची ही मुंबई वाचवण्याची जबाबदारी आपण महाराष्ट्राची भावंडे मिळून घेऊया” असा टोला सुषमा अंधारे यांनी भगतसिंह कोश्यारी यांना लगावला आहे.
काय आहे राज्यपालांचे वादग्रस्त वक्तव्य ?
“कधी कधी मी महाराष्ट्रातल्या लोकांना सांगत असतो की महाराष्ट्रात खासकरून मुंबई आणि ठाण्यातून गुजराथी समाजाचे आणि राजस्थानी समाजाचे लोक निघून गेले तर तुमच्याकडे कुठले पैसे उरणारच नाहीत. मुंबईला जे आर्थिक राजधानी म्हटलं जातं ते म्हटलंही जाणार नाही”
संदीप देशपांडे बरसले
“ज्या गोष्टीची माहिती नाही, महाराष्ट्राचा इतिहास माहिती नाही, त्यावर बोलू नये, नको त्या गोष्टीत राज्यपालांनी नाक खुपसण्याची गरज नाही. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे, फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, महाराष्ट्र किंबहुना मुंबईच्या प्रगतीमध्ये मराठी माणसाचा हात आहे, इथे बाकी लोक आले, त्यांनी स्वतःची प्रगती केली, त्यामुळे महाराष्ट्राच्या किंवा मुंबईच्या प्रगतीत त्यांचा हात नाही, असेलच तर त्यांच्या प्रगतीत महाराष्ट्र किंवा मुंबईचा हात आहे, १०५ हुतात्म्यांनी बलिदान देऊन ही मुंबई महाराष्ट्रात आणली आहे, त्यामुळे ज्या गोष्टी माहिती नाही, इतिहास माहिती नाही, नको त्या गोष्टीत राज्यपालांनी नाक खुपसू नये असं आमचं स्पष्ट म्हणणं आहे” अशी प्रतिक्रिया मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ‘एबीपी माझा’ वृत्तवाहिनीला दिली.
“राज्यपालांना ही पहिली वॉर्निंग आहे, इथे आलाय राज्यपाल म्हणून, आम्ही त्यांचा आदर करतो, त्यांच्या पदाचा आदर करतो, त्यांनी गुण्यागोविंदाने इथे राहावं, नको त्या गोष्टीत शहाणपणा करु नये” असंही देशपांडेंनी सुनावलं. मनसे आणि भाजपची गेल्या काही काळात जवळीक वाढत असल्याने या मुद्द्यावरुन भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी संवाद साधणार का? असा प्रश्न विचारला असता, राज्यपाल हे काही भाजपचे नाहीत, ते न्यूट्रल असतात, त्यामुळे त्यांनाच आम्ही सांगू, असंही स्पष्टीकरण देशपांडेंनी दिलं.
राज्यपाल नेहमीच आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी याआधीही वादग्रस्त वक्तव्य केलेले आहेत. महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीमाई फुले यांच्या लग्नावरून त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. तसंच स्वामी रामदास गुरु नसते तर छत्रपती शिवराय घडलेच नसेल असं देखील त्यांनी वक्तव्य केलं होतं. या वक्तव्यानंतर राज्यपालांना महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच्या रोषाला सामोरं जावं लागलं होतं.