काँग्रेस आक्रमक पवित्र्यात, राज्यपालांना करून दिली त्यांच्याच पत्राची आठवण
![The Congress, in its aggressive sanctity, reminded the Governor of his own letter](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/07/The-Congress-in-its-aggressive-sanctity-reminded-the-Governor-of-his-own-letter.jpg)
मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेचा विषय ठरलेल्या विधानसभा अध्यक्षांच्या निवडीचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार आहे. मात्र यावरून काँग्रसने आता आक्रमक पवित्रा धारण केला असून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना लक्ष्य केले आहे. विधानसभा अध्यक्षांच्या निवडीसंदर्भात आपण जवळपास तीन वेळा राज्यपालांची भेट घेत निवडणूक घेण्याची मागणी केली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयातील याचिकेचे कारण देत त्यांनी ही परवानगी नकारली होती. मग आता विधानसभा अध्यक्षांच्या निवडीसाठी इतकी घाई का, असा प्रश्न काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी उपस्थित केला आहे.
राज्य विधिमंडळाचे दोन दिवसीय विशेष अधिवेशन उद्या, ३ आणि सोमवारी, ४ जुलै रोजी बोलविण्यात आले आहे. या अधिवेशनात नव्या शिंदे सरकारला बहुमत सिद्ध करावे लागणार असून त्याबरोबरच विधानसभा अध्यक्षांची निवडदेखील केली जाणार आहे. महाविकास आघाडी सरकार असताना विधानसभा अध्यक्ष निवडीसाठी राज्यपालांनी परवानगी नाकारली होती. त्यासंदर्भातील पत्रही दिले होते. याच पत्राचा आधार घेऊन काँग्रेसने आता राज्यपालांवर टीका केली आहे. या सर्व प्रकरणात लोकशाहीची आणि राज्यघटनेची थट्टा झाल्याचा आरोप थोरात यांनी केला आहे.
बाळासाहेब थोरात पुढे म्हणाले, ‘विधानसभा अध्यक्ष निवडीसाठी आमचे शिष्टमंडळ तीनवेळा राज्यपालांना भेटले होते. अध्यक्षांची निवड करू द्या, अशी मागणी आम्ही वेळोवेळी केली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या याचिकेचे कारण देत त्यांनी ही परवानगी नाकारली होती. आता मात्र ही निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे याबद्दल शंका उपस्थित होते. या निवडीसंदर्भात आम्ही जो कायद्यात बदल केला होता, तो वैध ठरला का? की जुन्याच पद्धतीने ही निवड केली जाणार आहे, याचे उत्तर अपेक्षित आहे.’