राज्य विधिमंडळाचे १८ जुलैपासून सुरू होणारे पावसाळी अधिवेशन पुढे ढकलण्याचा निर्णय; कारण काय?
![State Legislature's decision to postpone Monsoon session starting July 18; What is the reason?](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/07/State-Legislatures-decision-to-postpone-Monsoon-session-starting-July-18-What-is-the-reason.jpg)
मुंबई: राज्य विधिमंडळाचे १८ जुलैपासून सुरू होणारे पावसाळी अधिवेशन पुढे ढकलण्याचा निर्णय विधिमंडळ सचिवालयाने शुक्रवारी जाहीर केला. या अधिवेशनाची पुढील तारीख संसदीय कार्य विभागाने कळविल्यानंतर जाहीर करण्यात येणार असल्याची घोषणा विधिमंडळाचे प्रधान सचिव राजेंद्र भागवत यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली. दरम्यान, शिंदे सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार रखडल्यामुळेच हे अधिवेशन पुढे ढकलण्यात आल्याचे बोलले जात आहे.
राज्य विधीमंडळाचे विशेष अधिवेशन नुकतेच मुंबईत पार पडले. या अधिवेशनात आगामी पावसाळी अधिवेशन येत्या १८ जुलैपासून सुरू होईल, असे जाहीर करण्यात आले होते. मात्र १८ जुलैला राष्ट्रपतिपदासाठी निवडणूक होणार असल्याने १८ जुलैऐवजी १९ किंवा २० जुलैपासून हे अधिवेशन सुरू होईल, अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तसे संकेतही विशेष अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी पत्रकार परिषदेत दिले होते. अखेर हे पावसाळी अधिवेशन पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भात विधिमंडळ सचिवालयातर्फे सर्व आमदारांना कळविण्यात आले आहे. त्यामुळे अनिश्चित काळासाठी अधिवेशन पुढे ढकलण्यात आले आहे.
दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नव्याने स्थापन झालेल्या शिंदे सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार अद्याप झालेला नाही. त्यामुळे हे अधिवेशन पुढे ढकलण्यात आले आहे. साधारण १९ जुलै रोजी मंत्रीमंडळ विस्तार होणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे जुलै महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात अधिवेशन बोलविण्यात येईल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.