शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा मुंबईत बंडखोरांच्या मतदारसंघात निष्ठा यात्रा सुरू
![Shiv Sena leader, Yuva Sena chief, MLA Aditya Thackeray once again launched Nishta Yatra in Mumbai in the constituencies of rebels](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/07/Shiv-Sena-leader-Yuva-Sena-chief-MLA-Aditya-Thackeray-once-again-launched-Nishta-Yatra-in-Mumbai-in-the-constituencies-of-rebels.jpg)
मुंबई : शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा मुंबईत बंडखोरांच्या मतदारसंघात निष्ठा यात्रा सुरू केली आहे. गुरुवारी आदित्य ठाकरे यांनी बंडखोर खासदार राहुल शेवाळे आणि आमदार दिलीपमामा लांडे यांच्या मतदारसंघात निष्ठा यात्रा काढत निवडणुकीला सामोरे जाण्याचं आव्हान दिलं. यावेळी अजान सुरु होताच आदित्य ठाकरेंनी भाषण थांबवलं.
उद्धव ठाकरे आजारी होते, तेव्हा हे गद्दार काय करत होते, आमदार-खासदार गोळा करत होते, ही गोष्ट तुम्हाला पटतेय का? असा सवाल आदित्य ठाकरेंनी विचारला. यावेळी प्रेक्षकांतून उत्तर येत होती. त्याचवेळी अजान सुरु झाली. त्यावर ‘मला वाटतं दोन मिनिटं थांबूया यांच्यासाठी’ असं म्हणत आदित्य काही काळ थांबले. काही मिनिटं वाट पाहत आदित्य ठाकरेंनी घड्याळात पाहिलं आणि पुन्हा भाषणाला सुरुवात केली.
आदित्य ठाकरे यांनी मानखुर्द-अणुशक्तीनगर येथील शाखा क्रमांक १३९ आणि चांदीवली येथी शाखा क्रमांक १६२ ला भेट देत शिवसैनिकांशी संवाद साधला. एक वेळ होती मी आमदारांना निवडून आणण्यासाठी जात होतो. मात्र त्यांनी पक्ष प्रमुखांसोबत गद्दारी केली. त्यांना जायचं होतं, तर गेले असते. जिथे आहात सुखी राहा, नगरसेवक पासून स्टँडिंग कमिटी; नंतर दोन वेळा खासदार केलं, असं म्हणत जायचं होतं, गेलात पण थोडी लाज बाळगा, राजीनामा द्या आणि जनतेसमोर जाऊन निवडून या, असं खुलं आव्हान पुन्हा एकदा आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदार-खासदार यांना दिलं.
आदित्य ठाकरे यांनी चांदिवली येथे दिलीपमामा लांडे यांच्या मतदारसंघात शिवसैनिकांशी बोलताना दिलीप लांडे यांच्या केलेल्या कामांची यादीच वाचली. कामं करून देखील गद्दारी केल्याची खंत आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली. पूर्ण महाराष्ट्राचा मी दौरा करत आहे. ज्या माणसाला मी आपल्या जवळच्या समजत होतो. दिलीप मामा यांनी जेवढे वेळा बोलावलं मी आलो. त्यांच्यासाठी काय कमी केलं आम्ही, की ते निघून गेले? दिलीप मामाला आम्ही काहीच कमी केलं नाही. चांदीवली हा भाग दिलीप मामा लांडे यांचा आहे. आम्ही या मतदारसंघात अनेक वेळा फिरलो. त्यांचे अनेक प्रश्न सोडविले, काय चूक केली? 100 लोकांना चावी वाटप केलं, अनेक कामे आम्ही चांदीवलीत केली, असं आदित्य ठाकरे यांनी सांगितलं.