नांदेडच्या केळीला २००० रु. क्विंटलाचा भाव, स्थानिक बाजारातच विक्रमी दर
![Rs 2,000 for Nanded bananas The price per quintal is a record price in the local market](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/07/Rs-2000-for-Nanded-bananas-The-price-per-quintal-is-a-record-price-in-the-local-market.png)
नांदेड : केळी उत्पादनात राज्यात जळगावनंतर नांदेड जिल्ह्याचा नंबर लागतो. नांदेडमधल्या अर्धापूरच्या केळीला महाराष्ट्रतच नव्हे तर संपूर्ण देशात, परदेशातही मागणी आहे. दरम्यान यंदा पुरवठ्याच्या तुलनेत मागणी वाढल्याने सध्या स्थानिक बाजारात केळीला तब्बल २००० ते २२०० रूपये प्रति क्विंटलाचा विक्रमी भाव मिळत आहे. स्थानिक बाजारातच विक्रमी दर मिळत असल्याने शेतकर्यांची चांदी झाली आहे. तसेचं शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद देखील पाहायला मिळत आहे. हा आत्तापर्यंतचा सर्वाधिक ऐतिहासिक दर असल्याचं केळी उत्पादक शेतकर्यांनी सांगितले. बाहेर देशात निर्यात झाल्यास आणखी दरवाढ होण्याची शक्यताही व्यापार्यांनी वर्तवली आहे.
चार तालुक्यातील १५ हजार हेक्टरवर केळीची लागवड
जिल्ह्यातील नांदेड, अर्धापूर, भोकर आणि मुदखेड या तालुक्यात प्रामुख्याने केळी पिकाची सर्वाधिक लागवड केली जाते. जिल्ह्यात साधारण १५ हजार हेक्टरवर केळी पिकाचे लागवड क्षेत्र आहे. दरम्यान, गतवर्षी सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टीने केळी पिकाचे मोठे नुकसान झाले होते. केळी पिकावर बुरशीजन्य रोगाचा प्रार्दुभाव झाल्याने केळी कापून फेकून देण्याची वेळ आली होती. तसेच मध्यंतरी वादळी वर्यामुळे मध्यप्रेदश, बर्हाणपुर, जळगाव, हिंगोली, नांदेड जिल्ह्यात केळीचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे लागवडीच्या क्षेत्रातही घट झाली होती. मागील तीन वर्षात केळी उत्पादकांना सतत संकटना तोंड द्यावे लागले. सध्या मागणी वाढली असून त्या तुलनेत उत्पादन नसल्याने केळीच्या दरात विक्रमी वाढ झाली आहे. क्विंटलाला २००० ते २२०० रूपये इतका विक्रमी भाव आत्तापर्यंतच्या इतिहासात पहिल्यांदाच मिळाला आहे.
केळीचा एका घड २५० ते ३०० रूपयाला विकला जात आहे. विशेष म्हणजे स्थानिक बाजारातच विक्रमी दर मिळाला आहे. यापूर्वी १८०० रूपये क्विंटलाला दर मिळाला होता. त्यापुढे दर कधीच गेला नव्हता. असं स्थानिक केळी उत्पादक शेतकर्यांनी सांगितलं आहे.
अर्धापुरीची केळी चविष्ट
नांदेडमधील अर्धापुरी नावाची केळी देशभर प्रसिद्ध आहे. ही केळी चविष्ट आणि टिकाऊ आहे. किमान आठ दिवस केळी राहते. त्यामुळे अफगाणिस्तान, तुर्कस्तान, इराण, इराक, दुबई या देशांत येथील केळीची निर्यात होते.
यंदा शेतकऱ्यांना सर्वाधिक नफा
अर्धापूर परिसरातून देशभरात केळीची मोठी मागणी असते. सध्या फक्त देशाअंतर्गत भागातच केळी पाठवली जात आहे. तरी केळीला क्विंटलाला २००० ते २२०० रुपये भाव मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत आहे. भाविष्यात बाहेर देशात निर्यात झाल्यावर आणखी दर वाढ होण्याची शक्यता आहे. अशी आशा केळी उत्पादक शेतकऱ्यांना आहे.