कोकणात ४ तासांपासून पावसाची तुफान बॅटिंग, जीवघेणा परशुराम घाट बंद
![Rain storm in Konkan for 4 hours Batting, deadly Parashuram Ghat closed](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/07/Rain-storm-in-Konkan-for-4-hours-Batting-deadly-Parashuram-Ghat-closed.png)
रत्नागिरी (चिपळूण): कोकणातील चिपळूण जवळील मुंबई – गोवा महामार्गावरील परशुराम घाट वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. गेल्या चार तासांपासून चिपळूणमध्ये सूरू असलेल्या मुसळधार पावसामुळे खबरदारीचा उपाय म्हणून वाहतूक बंद करण्यात आली आहे. दोन दिवसांपूर्वी मध्यरात्री दरड कोसळून हा घाट वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. सध्या हलक्या वजनाची वाहतूक कळंबस्ते – आंबडस- लोटे मार्गे वळविण्यात आली आहे. दोन दिवसांपूर्वी शनिवारी रात्री ज्या ठिकाणी दरड कोसळून मातीचा मोठा भराव होता त्याच ठिकाणी अजून काही दरड कोसळण्याची भीती आहे. त्यामुळे परशुराम घाट डेंजर झोनमध्ये असेल तर जिल्हा प्रशासनाने याबाबत योग्य तो निर्णय घेणे आवश्यक आहे. दरम्यान, उदया सकाळी परिस्थिती पाहून घाट वाहतुक सुरू करायची की नाही? याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. तसेच हा परशुराम घाट जीवघेणा देखील असल्याचं सांगण्यात आले आहे.
या सगळ्या प्रकरणांमध्ये राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागचं जबाबदार असल्याचा आरोप येथील स्थानिक ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. दोन दिवसांपूर्वी याच राष्ट्रीय महामामार्गावर चिपळूण रत्नागिरी दरम्यान असलेल्या कामथे येथे रस्त्याला भेगा पडल्याने मोठी खळबळ उडाली होती. त्यामुळे या मार्गावर एकेरी वाहतूक सुरू ठेवण्याची नामुष्की प्रशासनावर आली होती. खेड चिपळूण मार्गावरील परशुराम घाटातही दरडी कोसळण्याचा धोका असल्याने वाहनचालक जीव मुठीत धरुन प्रवास करत आहेत. वास्तविक हा घाट पावसाळ्यात वाहतुकीसाठी धोकादायक ठरणार असेल तर प्रशासनाने गांभीर्याने याचा विचार करायला हवा. असंही तिथल्या ग्रामस्थांनी सांगितलं आहे.
तसेच त्या ठिकाणी असलेल्या कल्याण टोलवेज कंपनीच्या कामाबद्दल नागरिकांमध्ये नाराजी आहे. एप्रिल ते मे महिन्याच्या कालावधीत तब्बल एक महिना हा परशुराम घाट दिवभर काही काळ वाहतुकीस बंद ठेवण्यात आला होता. तरीही मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटात अनेक ठिकाणी अजस्त्र दरड मार्गावर येण्याचा धोका कायम आहे. दोन दिवसांपूर्वी शनिवारी रात्री त्याचा प्रत्यय आला आहे.
ही दरड शनिवारी रात्री कोसळली त्याच ठिकाणी काही महिन्यांपूर्वी अलीकडे एक जेसीबी खाली आला व यात एक निष्पाप चालकाचा बळी गेला होता. आज त्याच ठिकाणी पुन्हा दरड कोसळून मातीचा मोठा भराव आल्याने हा राष्ट्रीय महामार्ग काही काळ बंद ठेवण्याची नामुष्की प्रशासनावर आली आहे. या सगळ्याला राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाचे अधिकारी, अभियंते जबाबदार आहेत का? याचीही चौकशी होणे आवश्यक आहे.