मातोश्री समोर हनुमान चालीसा म्हणायला ती काय मशीद आहे का? राज ठाकरेंचा राणा दाम्पत्यावर वार
![PCMC ELECTION 2022: Opportunity for Clean Character Candidates for City Development, Apply - Appeal of 'Aap'](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/05/Appeal-of-Aap.jpg)
पुणे : “मशिदीवरील अनधिकृत भोंगे हटवा ही मागणी आम्ही केल्यानंतर ते राणा दाम्पत्य उठलं आणि मातोश्री समोर हनुमान चालीसा म्हणायचा हट्ट केला. अरे मातोश्री समोर हनुमान चालीसा म्हणायला ती काय मशीद आहे का?”, असा सवाल करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राणा दाम्पत्याला जोरदार चपराक लगावली.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची अयोध्या दौरा रद्द केल्यानंतर पुण्यात बहुप्रतिक्षीत सभा पार पडत आहे. भाषणाच्या सुरुवातीलाच त्यांनी शरद पवार यांना सणसणीत टोला लगावला. तर पुढच्या काही मिनिटांत अयोध्या दौरा रद्द करण्याची कारणं सांगितली. सध्या सुरु असलेल्या हनुमान चालिसा-भोंगेवादावरही त्यांनी परखड भाष्य करताना राणा दाम्पत्याला जोरदार चपराक लगावली.
“मी सांगितलं काय की जर मशीदीवरती जोरात बांग दिली तर त्यासमोर जाऊन हनुमान चालिसा लावा आणि यांनी केलं काय, मातोश्रीवर जाऊन हनुमान चालिसा पठणाचा हट्ट… अरे मातोश्री समोर हनुमान चालीसा म्हणायला ती काय मशीद आहे का?”, अशा शब्दात राज ठाकरेंनी राणा दाम्पत्याचा समाचार घेतला.
राज ठाकरे अयोध्या दौऱ्यावर बोलताना म्हणाले…
“एक कुणीतरी तिकडचा खासदार उठतो आणि तिकडच्या मुख्यमंत्र्यांना आव्हान देतो, हे शक्य आहे का? याला अनेक पापुद्रे आहेत. मला सगळं सांगणं शक्य नाही.. दौरा रद्द झाल्याने अनेक जण माझ्यावर टीका करतायत… मी शिव्या खायला तयार आहे.. पण माझ्या मनसेच्या पोरांवर मी केसेस होऊ देणार नाहीत. कुणाच्याही षडयंत्राला मी बली पडणार नाही…”
“आता जाग झाली, राज ठाकरेंनी माफी मागायला पाहिजे वगैरे… १२-१४ वर्ष कुठे होती ही सगळी माणसं… एक सांगतो यातून चुकीचे पायंडे पडतायेत…. विषय माफी मागण्याचाच आहे ना… गुजरातमध्ये अप्लेश ठाकूर म्हणून एक गृहस्थ आहे… उत्तर प्रदेश बिहारमधून जी माणसं कामासाठी गेली होती… तिथे कुणाकडून तरी एका मुलीवर बलात्कार झाला… त्यावेळी १५ ते २० हजार माणसांना मारण्यात आलं, हुसकावण्यात आलं… मग ती माणसं महाराष्ट्रात आली.. महाराष्ट्रातून पुन्हा युपीत गेली.. मग या सगळ्या प्रकरणात कोणी माफी मागायची….? असा सवाल राज ठाकरेंनी विचारला. तुम्ही हे सगळं राजकारण समजून घेण्याची गरज आहे, असंही त्यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केलं.