खड्ड्यामुळे तोल जाऊन दुचाकीवरील दोघे पडल्यानंतर यातील एकाचा डंपरखाली येऊन मृत्यू
ठाणे : खड्ड्यामुळे तोल जाऊन दुचाकीवरील दोघे पडल्यानंतर यातील एकाचा डंपरखाली येऊन मृत्यू झाला आहे. मुंबई-नाशिक महामार्गावरील रांजनोळी नाका (भिवंडी) पुलापासून १०० मीटर अंतरावर हा अपघात झाला. ब्रिजेशकुमार उर्फ मुनीकाका लेढा जैसवार यांचा या अपघातामध्ये मृत्यू झाला आहे. ते उल्हासनगर येथील रहिवासी होते . हा अपघात शनिवारी दुपारी झाला असून सायंकाळी पोलीस ठाण्यात संबधित डंपरचालकावर गुन्हा दाखल झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रामजनक शर्मा हे ब्रिजेशकुमार यांना दुचाकीवरुन माणकोली नाका येथे घेऊन गेले होते. दुपारी १.१५ वाजता काम संपल्यानंतर दोघेही दुचाकीवरुन मुंबई-नाशिक महामार्गावरुन रांजणोली नाक्याच्या दिशेने येत होते. यावेळी रामजनक दुचाकी चालवत होते. रांजणोळी नाका पुलापासून १०० मीटर अंतरावर ठाण्याच्या बाजूकडे आल्यानंतर वाहने हळूहळू धावत होती. त्यामुळे रामजनक याने दुचाकी रस्त्याच्या खाली घेतली. यावेळी अचानक दुचाकी खड्ड्यात गेली आणि तोल जाऊन दोघेही दुचाकीवरुन रस्त्यावर पडले. त्यावेळी मुंबईकडून नाशिककडे निघालेला डंपर ब्रिजेशकुमारच्या अंगावरुन गेला आणि ते गंभीर जखमी झाले.
दरम्यान, जखमी ब्रिजेशकुमार यांना तात्काळ भिवंडीतील आयजीएम रुग्णालयात नेण्यात आले. मात्र त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. या अपघातानंतर डंपरचालक पळून गेला आहे.