अंबरनाथमध्ये एका तरुणाचा मृतदेह पोत्यात भरून तलावात फेकल्याचं प्रकरण…
![In Ambernath, the case of a young man's body being stuffed in a sack and thrown into the lake...](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/08/In-Ambernath-the-case-of-a-young-mans-body-being-stuffed-in-a-sack-and-thrown-into-the-lake....jpg)
अंबरनाथ: अंबरनाथमध्ये एका तरुणाचा मृतदेह पोत्यात भरून तलावात फेकल्याचं प्रकरण समोर आलं होतं. या प्रकरणाचं गूढ सोडवण्यात अखेर पोलिसांना यश आलं आहे. याप्रकरणी अंबरनाथ पोलिसांनी २ जणांना बेड्या ठोकल्या आहेत. भाईगिरीच्या नादात पाच जणांकडून ही हत्या करण्यात आल्याची माहिती आहे. याप्रकरणातील तिघे अद्यापही फरार आहेत. फरार आरोपींच्या शोधासाठी पोलिसांनी उत्तर प्रदेशात पथकं रवाना केली आहेत.
अंबरनाथ पश्चिमेच्या जावसई तलावात ४ ऑगस्ट रोजी एका तरुणाचा पोत्यात भरलेला मृतदेह आढळला होता. हा मृतदेह उल्हासनगरच्या हनुमान नगर परिसरात राहणाऱ्या विशाल राजभर याचा असल्याचं निष्पन्न झालं होतं. यानंतर या प्रकरणाचा तपास करताना ही हत्या भाईगिरीच्या नादातून झाल्याचं समोर आलं आहे. विशाल याचा मित्र स्वप्नील उर्फ आर. के. जैस्वार याला काही दिवसांपूर्वी काही तरुणांनी मारहाण केली होती.
ही मारहाण सचिन चौहाण या गुंड प्रवृत्तीच्या तरुणाच्या सांगण्यावरून झाल्याचा संशय मृत विशाल राजभर याला असल्यानं त्यानं ३० जुलै रोजी सचिन चौहाण याला चारचौघात मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली होती. याचा राग काढण्यासाठी सचिन चौहान याने १ ऑगस्ट त्याचे सहकारी अजय जैस्वार, रोशन सहानी, समीर सिद्दीकी आणि एक अल्पवयीन मुलगा यांच्या मदतीने विशाल राजभर याला ऑर्डनन्स इस्टेट परिसरात गाठत त्याची हत्या केली आणि त्याचा मृतदेह पोत्यात भरून तो वर येऊ नये म्हणून त्याला दगडाच्या गोण्या बांधून तलावात फेकून दिला.
याप्रकरणी पोलिसांनी आरोपी रोशन सहानी आणि एका अल्पवयीन मुलाला अटक केली असून मुख्य आरोपी सचिन चौहाण याच्यासह अजय जैस्वार आणि समीर सिद्दीकी यांच्या शोधासाठी उत्तर प्रदेशात पथकं रवाना करण्यात आल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त जगदीश सातव यांनी दिली आहे.