महाराष्ट्रात मुसळधार पावसाने वाहतूक रोखली; मराठवाडा, विदर्भ आणि कोकणात जाणारे महत्त्वाचे मार्ग बंद
![Heavy rains halt traffic in Maharashtra; Important routes to Marathwada, Vidarbha and Konkan closed](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/08/Heavy-rains-halt-traffic-in-Maharashtra-Important-routes-to-Marathwada-Vidarbha-and-Konkan-closed.png)
हिंगोली : राज्यभरात मागील तीन दिवसांपासून पावसाने सपाटा लावला आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून सतत पडणाऱ्या पावसामुळे शेतातील कामेदेखील ठप्प झाली आहेत. मागील दोन ते तीन दिवसांपासून इसापूर धरण परिसर व पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे धरणात आवक वाढली आहे. परिसरातील पाऊस आणि वाढलेली आवक यामुळे इसापूर धरणातून विसर्ग करण्यात येत आहे.
आज सकाळी ११ वाजता धरणाची २, १४, ८, ७, ९, ६, १०, ५, ११, ४, १२ क्रमांकाचे दरवाजे १ मीटरने दरवाजा क्रमांक ३ व १३ हे दोन दरवाजे ५० सेमीने उघडण्यात आले आहेत. १३ दरवाजातून पैनगंगा नदीपात्रात ३९१०१ क्युसेक्स इतका विसर्ग सूरू आहे. धरणामध्ये येणारी पाण्याची आवक पाहून विसर्ग वाढवणे किंवा कमी करणे याबाबतचा निर्णय घेण्यात येणार आहे. पैनगंगा नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे.
आवक वाढल्याने इसापूर धरणाचे १३ दरवाजे उघडून पैनगंगा नदी पात्रात विसर्ग करण्यात येत आहे. अचानक पाणी पातळी वाढल्याने शिऊर पुलावरून पाणी वाहत आहे. यामुळे शेंबाळपिंपरी ते कळमनुरी मार्ग आज सकाळीपासून ६.३० वाजेपासून बंद झालेला आहे. हा मार्ग बंद झाल्याने विदर्भ-मराठवाडा संपर्क तुटला आहे.
पैनगंगा नदी पात्रात धरणाचे पाणी सोडण्यात येत असल्यामुळे विदर्भ मराठवाड्याला जोडणारा शिऊरच्या पुलावरून तीन ते चार फुटापर्यंत पाणी जात आहे. पुलाच्या दोन्ही बाजूला बॅरिकेट्स लावण्यात आलेले आहेत. हा पूल पूर्णपणे वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे. आज सकाळी साडेसहा वाजेपासून विदर्भ मराठवाड्याचा संपर्क तुटलेला आहे. विदर्भाकडे जाणाऱ्या नागपूर, चंद्रपूर, पुसद आदी बसेस येथील आगारातच लावलेल्या आहेत. पुसदहून कळमनुरीकडे येणाऱ्या बसेस पुसद येथेच थांबविण्यात आलेल्या आहेत. कळमनुरीहून पुसदकडे जाणाऱ्या सर्व बसेस व वाहतूक बंद आहे.
कोल्हापूर-रत्नागिरी मार्ग वाहतूकीसाठी बंद
कोकणात रविवारपासूनच पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. यामुळे कोल्हापूर-रत्नागिरी मार्ग वाहतूकीसाठी बंद करण्यात आला आहे. याआधी गगनबावडा रस्ता मुसळधार पावसामुळे बंद करण्यात आला होता. त्यानंतर आता कोकणात जाणारा दुसरा रस्ता देखील बंद झाल्याने नागरिकांच्या अडचणी वाढणार आहेत. केर्ली गावात रस्त्यावर पाणी आल्यानंतर हा रत्नागिरीला जाणारा रस्ता बंद ठेवण्यात आला आहे. कोल्हापूरात येणाऱ्या वाहानांना येऊ दिले जात आहे.
वर्धा जिल्ह्यातील अनेक मार्ग वाहतुकीसाठी बंद
नदी, नाल्याना पूर आल्याने कारंजा तालुक्यातील कारंजा माणिकवाडा रस्ता बंद झाल्याने तेथील सहा गावांचा संपर्क तुटला आहे. यामुळे वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे. आर्वी तालुक्यातील कासारखेड सावध, आर्वी कौढण्यपूर, आर्वी वर्धमनेरी हे मार्ग वाहतुकीसाठी बंद आहे तर हिंगणघाट तालुक्यातील सिरसगाव कापसी आणी चानकी भगवा हे मार्ग बंद झाले आहे.
पंचगंगेचं पाणी पुन्हा नदीपात्राबाहेर, पावसाची जोरदार बॅटिंग सुरूच
दोन राज्यांचा संपर्क तुटला; तब्बल ७ महत्त्वाचे मार्ग ठप्प
राज्यात गेल्या ३ दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. अशात चंद्रपूर जिल्ह्यात पावसाने थैमान घातलं आहे. महाराष्ट्र आणि तेलंगणावरील पोडसा पुल पाण्याखाली गेल्यामुळे महाराष्ट्र-तेलंगणाचा संपर्क तूटला आहे. चंद्रपूर-गडचीरोली जिल्हाला जोडणारा आष्टी पुलही पाण्याखाली गेल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.
पुलावर पाणी साचल्याने मार्गावरील वाहतुक बंद करण्यात आली आहे. यामध्ये भोयगाव – धानोरा, वरोरा – वणी मार्ग ठप्प झाले आहेत. राजुरा – बल्लारपूर, सास्ती – बल्लारपूर, घुग्घुस – मुंगोली मार्ग बंद पडले आहेत. दरम्यान, भारतीय हवामान विभागाने १० ऑगस्टपर्यंत चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट दिलेला आहे तर आज चंद्रपूरसाठी रेड अलर्ट आहे.