राज्यात मुसळधार पाऊस सुरू असून यामुळे अनेक जिल्ह्यांना पुराचा वेढा, तब्बल ८२ मार्ग बंद
![Heavy rains are going on in the state and due to this many districts are surrounded by flood, as many as 82 roads are closed](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/08/Heavy-rains-are-going-on-in-the-state-and-due-to-this-many-districts-are-surrounded-by-flood-as-many-as-82-roads-are-closed.png)
भंडारा : राज्यात मुसळधार पाऊस सुरू असून यामुळे अनेक जिल्ह्यांना पुराचा वेढा पाहायला मिळत आहे. अशात मागील ४८ तासांपासून पडणाऱ्या निरंतर पावसामुळे तसेच गोंदिया जिल्ह्यात मध्य प्रदेशच्या सीमावर्ती भागात झालेल्या जोरदार पावसामुळे भंडारा जिल्ह्याला या महिन्यात दुसर्यांदा पुराचा सामना करावा लागला आहे. वैनगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून लहान पूल पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे.
या पावसामुळे जवळपास ४८ गावांचा संपर्क तुटला आहे. यात भंडारा तुमसर हा मुख्य महामार्गसुद्धा बंद झाला आहे. भीषण पुरामुळे तब्बल ८२ मार्ग बंद झाल्याची माहिती आहे. यावर्षी पहिल्यांदाच गोसे धरणाचे दार हे ३ मीटरने उघडण्यात आले असून यामधून १५९४० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग होत असल्याने नदी काठावरील गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी दिलेला आहे.
भंडारा शहराला लागून असलेल्या वैनगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. २४५ ही धोक्याची पातळी असून सध्या पैनगंगा नदीची पाणीपातळी २४८.१३ मीटर इतकी आहे. मागील ४८ तासांपासून भंडारा, गोंदिया जिल्ह्यात आणि मध्यप्रदेशच्या सीमावरती भागात सतत पाऊस सुरू असल्याने वैनगंगा नदीच्या पातळीमध्ये झपाट्याने वाढ होत असल्याने नागरिकांनी सावधानता बाळगावी असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.
नदीत पाणी झपाट्याने वाढत असल्याने यावर्षी पहिल्यांदाच गोसे धरणाचे दार हे तीन मीटरने उघडण्यात आलेले आहे. आठ दिवसांआधी पूर परिस्थिती निर्माण झाल्यावर गोसे धरणाचे दार हे अडीच मीटरपर्यंत उघडण्यात आले होते. गोंदिया जिल्ह्यातील पुजारी टोला धरणाचे १३ दार, मध्यप्रदेशचे संजय सरोवरचे ४, भंडारा जिल्ह्यातील बावनथडी धरणाचे ६ आणि धापेवडा धरणाचे २३ दारे उउघडण्यात आल्याने हा सर्व पाणी वैनगंगा नदीत आल्याने भंडारा जिल्ह्यात पूर पूरपरिस्थिती निर्माण झाली.
ही पूर परिस्थिती अजून वाढू नये यावर नियंत्रण मिळवता यावे यासाठी गोसे धरणाचे ३३ ही दार उघडण्यात आले असून ११ गेट ३ मीटरने तर २२ गेट अडीच मीटरने उघडण्यात आले असून यामधून १५९४०.४३ क्युमेक्स पाण्याचा विसर्ग होत आहे. यामुळे नदीकाठावरील गावांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. आतापर्यंत ४८ गावांचा संपर्क तुटलेला आहे.