कलेसाठी कार्यरत असणाऱ्या संस्थांना आर्थिक पाठबळ द्यावे: ज्येष्ठ नाटककार सतिश आळेकर
![Give financial support to organizations working for art: Senior playwright Satish Alekar](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/05/कलेसाठी-कार्यरत-असणाऱ्या-संस्थांना-आर्थिक-पाठबळ-द्यावे-–-ज्येष्ठ-नाटककार.jpg)
पिंपरी : परदेशात कलेला सबसिडी आहे पण आपल्या देशात कलेला सबसिडी मिळत नाही हे दुदैव आहे. कोणत्याही आस्थापणेचे आणि शासन यंत्रणेचे हे कर्तव्य आहे की त्यांनी कलेसाठी योगदान दिले पाहिजे. कलेसाठी कार्यरत अशा संस्थांना आर्थिक पाठबळ द्यावे, असे आवाहन ललित कला केंद्रचे माजी संचालक आणि ज्येष्ठ नाटककार सतिश आळेकर यांनी आयुक्तांना केले.
थिएटर वर्कशॉप कंपनी संचलित आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्र विभागांतर्गत नाट्य अभिनय प्रमाणपत्राच्या पहिल्या वर्गाचे उद्घाटन पैस रंगमंच याठिकाणी करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी आयुक्त राजेश पाटील उपस्थित होते. यावेळी शहरातील सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असलेले रंगकर्मी, संस्था प्रतिनिधी उपस्थित होते.
सतीश आळेकर पुढे म्हणाले की, ज्या पद्धतीचे नाटक आपण करतो ते लोकप्रिय होईलच याची खात्री नसते. विजय तेंडूलकरांसारखे नाटककार हे मॅट्रीक होते. जे पडेल ते काम करत होते. त्यांना पाहिजे ती नाटके त्यांनी लिहीली आणि नाटकाचा आवाका त्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर नेला. काही लोकांना व्यावसायिक जगणंच नाटकावर अवलंबून ठेवायचं असतं त्यामुळे त्या पद्धतीची नाटकं ते करतात. हौशी, प्रायोगिक, व्यवसायिक या नाटकाच्या अनेक धारा वेगवेगळ्या आहेत. या सगळ्यांच्यामध्ये प्रेक्षक आणि नट यांचे नाते आई आणि मुलासारखे आहे. आई ज्याप्रमाणे मुलाला शिकविते तसे ते मूल आईचे अनुकरण करते. त्यामुळे बालकावस्थेत आईला तो कलाकार रुपात पाहतो इतके ते नाते जुने आहे.
नाटकाचे प्रशिक्षण का घ्यायचे असा प्रश्न पडतो. नाटकाच्या प्रशिक्षणाची गरज काय? आत्तापर्यंत जे कलावंत झाले ते शिकले होतेच असे नाही. सन १८४२ पासूनची नाटकाची परंपरा आहे. नाटकाचे असे सिद्ध व्याकरण नाही. गाण्याला आणि नृत्याला जसे व्याकरण आहे नाटकाच्या बाबतीत असे नाही. जो तो आपल्या पद्धतीचे नाटक करतो. नाटकातला कलाकार तयार होतो तेव्हा त्याला कुठे तरी साक्षात्कार व्हायला लागतो. प्रशिक्षणानंतर त्याला कळते की आपण किती पाण्यात आहोत आणि त्यातूनच त्याचा न्यूनगंड तयार होत नाही. आतून त्याला वाटलं पाहिजे की तो कलाकार आहे. नाटकातून जी आयुधे मिळतात ती कुठे कुठे वापरता येतील याचा विचार झाला पाहिजे.
आयुक्त राजेश पाटील म्हणाले, आपल्याकडे जे कलाकार यांना या क्षेत्राविषयी आवड आहे त्यांच्यासाठी हे व्यासपीठ खूप महत्त्वाचे आहे. शहरातील ज्या निर्णय घेणार्या व्यक्ती असतात त्यांच्याकडून कला क्षेत्राकडे कमी लक्ष दिले जाते. या क्षेत्रासाठी काहीतरी करावे अशी माझी इच्छा आहे तसा ती प्रयत्न करत आहे. पुढे काही कल्पना आहेत त्यावर काम करायचे ठरविले आहे.