अकोल्यातील एकाच महाविद्यालयाच्या संस्थेत शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीसह चार विद्यार्थी बेपत्ता
![Four students, including a female student studying in the same college institute in Akola, are missing](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/08/Four-students-including-a-female-student-studying-in-the-same-college-institute-in-Akola-are-missing.jpg)
अकोला: अकोल्यातील एकाच महाविद्यालयाच्या संस्थेत शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीसह चार विद्यार्थी बेपत्ता झाल्याची घटना उघडकीस आली होती. एक ऑगस्ट रोजी हे चारही विद्यार्थी बेपत्ता झाले असून आठ दिवस उलटूनही त्यांचा शोध लागला नसल्यामुळं कुटुंबीयांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले होते. परंतु आज मंगळवार म्हणजेचं ९ ऑगस्ट रोजी या चारही विद्यार्थ्यांचा शोध लावण्यात अकोला पोलीस यशस्वी झाले.
आज पहाटे हे चौघेही जण मुंबई येथे सापडले आहेत. हे चौधेही सध्या मुंबईच्या निर्मल नगर पोलिसांच्या ताब्यात असून लवकरचं त्यांना अकोला पोलीस ताब्यात घेणार आहे. दरम्यान, हे चौघेजण सुरुवातीला नागपूर आणि कोलकत्ता त्यानंतर मुंबई इथे गेले असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, आज पहाटे मुंबईच्या खेरवाडी झोपडपट्टीमध्ये हे चौघेही जण सापडले आहेत. दरम्यान, पोलीस उपनिरीक्षक श्रीराम जाधव यांनी ही कामगिरी केली आहे. चौघांच्या बेपत्ता होण्यामागील नेमकं कारण कळू शकले नाही. या चौघांना अकोला आणल्यानंतर त्यांचा जबाब नोंदवण्यात येणार त्यानंतरच सर्व काहीच निष्पन्न होणार आहे. असेही पोलिसांनी म्हटले आहे.
काय होतं नेमकं प्रकरण?
तुळशी अनिल ताले (वय १८ , राहणार रेणुका नगर, डाबकी रोड, अकोला), प्रतीक मनोहर तायडे (वय २१ रा.अडगाव बु. ता.तेल्हारा, जि. अकोला), हर्ष विष्णू घाटोळ (वय १७ वर्ष ११ महिने, पळशी खुर्द ता.खामगाव, जि.बुलढाणा) आणि प्रफुल पांडुरंग लंगोटे (वय १९, राहणार न्यू भीम नगर, कृषी नगर, अकोला) या चौघांची बेपत्ता असल्याची तक्रार बाळापुर आणि सिव्हिल लाइन पोलीस ठाण्यात दाखल होती. हे चौघेही बाळापुर तालुक्यातील व्याळा येथील मानव संस्थेच्या अंतर्गत असलेल्या सिटी पॉलिटेक्निक आणि आयटीआय कॉलेजमध्ये शिक्षण घेत होते. हे चौघेही १ ऑगस्ट रोजी घरून कॉलेजमध्ये गेले होते, मात्र तेव्हापासून घरी परतलेच नव्हते.
निकालात अनुत्तीर्ण, म्हणून मुलं बेपत्ता झाल्याची भीती
मानव पॉलिटेक्निक कॉलेजचा यंदाचा निकाल अतिशय खराब लागला होता. मानव पॉलिटेक्निक कॉलेजमधून बेपत्ता असलेले दोघे जण अनुत्तीर्ण झाले असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे ते तणावात होते, अशी माहिती पोलिसांनी दिली होती. तर प्रतिक आणि हर्ष हे मानव पॉलिटेक्निक कॉलेजचा भाग असलेल्या आयटीआय मध्ये शिक्षण घेत होते. त्यांची चार ऑगस्ट पासून परीक्षा होती. मात्र त्यांनी ती परीक्षा दिलीचं नाही आहे.
तुळशी अनुत्तीर्ण झाल्याने होती तणावात…
तुळशी ताले ही देखील मानव पॉलिटेक्निक कॉलेजमधून कम्प्युटर पॉलिटेक्निकचं शिक्षण घेत आहे. ती देखील अनुत्तीर्ण झाली असून तिचे चार विषय राहिले होते. त्यामुळे ती गेल्या काही दिवसांपासून रडत होती, अशी माहीती तिच्या घरच्यांनी दिली होती. ती कॉलेजला जाते म्हणून घरून निघाली मात्र तेव्हापासून घरी परतलीच नव्हती.