घरी फडकावलेला ध्वज सायंकाळी उतरवू नका; राष्ट्रध्वज फडकवण्यापूर्वी ‘हे’ नियम माहिती करुन घ्या
![Do not take down the flag hoisted at home in the evening; Know these rules before hoisting the national flag](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/08/Do-not-take-down-the-flag-hoisted-at-home-in-the-evening-Know-these-rules-before-hoisting-the-national-flag.jpg)
महाराष्ट्र । भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात येणारा १५ ऑगस्ट हा ‘स्वातंत्र्य दिन’ आपण सर्वांनी राष्ट्रीय सण म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करावा, असे आवाहन केंद्र सरकारने केले आहे. देशात हर घर तिरंगा हे अभियान राबविण्यात येणार आहे. प्रत्येक घरावर तिरंगा लावण्यात येणार असला तरी ध्वजसंहितेचे पालन होणेही आवश्यक आहे. जिल्ह्यात ‘घरोघरी तिरंगा’ लावताना काय काळजी घ्यावी, तिरंग्याचा मान राखला जावा, यासाठी काय करावे याबाबत नागरिकांच्या मनात अनेक प्रश्न आहेत. त्याची उत्तर देण्याचा हा प्रयत्न.
– १३ ते १५ ऑगस्ट या काळात नागरिकांनी आपल्या घरावर झेंडा लावावा.
– ध्वज लावताना केशरी रंगाची बाजू काठीच्या वरच्या टोकाकडे असावी.
– ध्वज उलटा फडकवला जाणार नाही याची काळजी घ्यावी.
– तिरंगी ध्वजाचा आकार आयताकार असावा.
– झेंड्याची लांबी – रुंदीचे प्रमाण ३ X २ असावे.
– कातलेल्या, विणलेल्या, मशिनद्वारे तयार केलेल्या सूत, पॉलिस्टर, लोकर, सिल्क किंवा खादीपासून बनविलेल्या कपड्याचा ध्वज असावा.
– अर्धा तुटलेला, फाटलेला, मळलेला राष्ट्र ध्वज कोणत्याही परिस्थितीत फडकावू नये.
– कार्यालयांच्या ठिकाणी ध्वज फडकावल्यास ध्वज संहिता पाळावी. ध्वज सूर्योदयावेळी फडकवावा व सूर्यास्तावेळी उतरवावा.
– घरोघरी तिरंगा फडकावताना तो दररोज सायंकाळी उतरविण्याची गरज नाही.
– राष्ट्रध्वजासमवेत इतर कोणताही ध्वज एकाच काठीवर फडकावू नये.
– ध्वज उतरविल्यानंतर त्याची व्यवस्थित घडी घालून तो जतन करून ठेवावा.
काय करू नये?
– प्लास्टिकच्या ध्वजाचा वापर करू नये.
– फाटलेला अथवा चुरगाळलेला ध्वज लावू नये.
– ध्वज ज्या काठीवर फडकत असेल त्या काठीवर किंवा काठीच्या टोकावर फुले किंवा हार घालू नये.
– अन्य कोणताही ध्वज राष्ट्रीय ध्वजापेक्षा उंच नसावा व राष्ट्रीय ध्वजाच्या लगत नसावा.
– ध्वजाला माती व पाण्याचा स्पर्श होऊ नये.
– ध्वज फाटेल अशा पद्धतीने तो फडकवू नये, अथवा बांधू नये.
– ध्वज मलीन होईल अशा पद्धतीने वापरू नये किंवा ठेवू नये.
– ध्वजावर कोणत्याही प्रकारची अक्षरे लिहू नयेत.
– राष्ट्रध्वजाचा उपयोग घराच्या पडद्यासाठी किंवा अन्य कारणासाठी करू नये.
– अभियान कालावधीनंतर झेंडा फेकू नये. तो सन्मानाने जतन करावा.
– तिरंग्याचा वापर कोणतीही वस्तू गुंडाळण्यासाठी करू नका.