जूनअखेरीस मुंबईसह कोकणातही तूट; मुंबईकरांना पावसाची प्रतीक्षा
![Deficit in Konkan including Mumbai by end of June; Mumbaikars waiting for rain](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/06/Deficit-in-Konkan-including-Mumbai-by-end-of-June-Mumbaikars-waiting-for-rain.jpg)
मुंबईः मुंबईमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर पुढे पावसाची उपस्थिती फारशी जाणवली नाही. जून संपण्यासाठी केवळ एक आठवडा शिल्लक असून, अजूनही मुंबईमध्ये पावसाची तूट आहे. कोकण विभागातही अशीच स्थिती आहे. ही तूट भरून काढून पाऊस महिन्याची सरासरी गाठणार का, याची प्रतीक्षा आहे. पावसाने सरासरी न गाठल्यास धरणातील पाण्याची स्थिती काय असेल, हा प्रश्नही मुंबईकरांसमोर आहे.
मुंबईमध्ये बुधवारीही दिवसभर पावसाची फारशी हजेरी नव्हती. कुलाबा येथे ०.२ मिलिमीटर, तर सांताक्रूझ येथे ० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. संध्याकाळच्या सुमारास काही भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह तुरळक सरी कोसळल्या. पुढील तीन दिवसांमध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यानंतर रविवारी मध्यम सरींची शक्यता आहे. जूनचा शेवटचा आठवडा आला तरी अजूनही मुंबईतील पाऊस हा जूनमधील पाऊस असल्याची जाणीव झालेली नाही. सांताक्रूझ येथे १ जूनपासून २२ जूनला सकाळी ८.३०पर्यंत १७९.८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली, तर कुलाबा येथे २९१.४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. २२ जूनपर्यंतच्या सरासरी पावसाच्या तुलनेत सांताक्रूझ येथे १६२.३, तर कुलाबा येथे ५६.२ मिलिमीटर पावसाची तूट नोंदली गेली आहे.
कुलाबा येथे २०१२, २०१५, २०१६, २०१९ आणि २०२० मध्ये मासिक सरासरीपेक्षा पाऊस कमी होता. सर्वांत मोठी तूट जूनमध्ये कुलाबा येथे २०१५ मध्ये नोंदली गेली होती. यावेळी इथे महिन्याभरात केवळ ५५.२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती.
जूनच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत राज्यातील ३६पैकी २२ जिल्ह्यांमध्ये पावसाची तूट आहे, तर आठ जिल्ह्यांमध्ये ही तूट तीव्र नोंदली गेली आहे. केवळ सहा जिल्ह्यांमध्ये पाऊस सरासरीच्या श्रेणीमध्ये आहे. राज्यात २२जूनपर्यंत ४६ टक्के पावसाची तूट नोंदली गेली आहे. जूनच्या तिसऱ्या आठवड्याच्या अखेरीस अपेक्षित सरासरीपेक्षा रायगड येथे ५७ टक्के, तर रत्नागिरी येथे ६१ टक्के, अहमदनगर येथे ५१ टक्के, कोल्हापूर येथे ७७ टक्के, नंदुरबार येथे ६३ टक्के, नाशिक येथे ६० टक्के, पुणे येथे ६५ टक्के, सांगली येथे ६९ टक्के, सातारा येथे ७७ टक्के पावसाची तूट नोंदली गेली आहे. मराठवाडा आणि विदर्भातही पावसाची तूट आहे; मात्र कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या तुलनेत ती कमी आहे. मराठवाड्यात सर्वाधिक तूट जालना येथे ५४ टक्के, तर विदर्भात गडचिरोली येथे ५२ टक्के नोंदली गेली आहे.
हवा इतका पाऊस!
मुंबईमध्ये जूनमध्ये कुलाबा येथे ५४०.९ मिलिमीटर, तर सांताक्रूझ येथे ५०५ मिलिमीटर सरासरी पाऊस अपेक्षित असतो. मात्र कुलाबा येथे या सरासरीच्या केवळ ५४ टक्के पावसाची आत्तापर्यंत नोंद झाली आहे. तर सांताक्रूझ येथे मासिक सरासरीच्या ३६ टक्के पाऊसही अजून पडलेला नाही. सांताक्रूझ येथे २०१२, २०१४ आणि २०२०मध्ये जूनच्या पावसाला मासिक सरासरी गाठता आलेली नव्हती.