खाऊ आणण्यासाठी जाताना वाटेत मृत्यूने गाठलं, तीन चिमुकल्यांनी एकत्रच गमावले प्राण
![Death on the way to fetch food, three chimpanzees lost their lives together](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/06/Death-on-the-way-to-fetch-food-three-chimpanzees-lost-their-lives-together.jpg)
नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यातल्या धडगाव तालुक्यातील कुंडलचा मालपाडा गावात नदी पात्रात बुडून तीन चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हे तीनही चिमुकले देवानंद नदी ओलांडून पलीकडे असणाऱ्या हेंगलाचा पाडा इथे दुकानावर खाऊ आणण्यासाठी जात होते. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस अधिक तपास करत असल्याची माहिती आहे.
खरंतर, दोन दिवसांपूर्वी पडलेल्या पावसाने नदी काहीशी प्रवाहीत झाली आहे. त्यातच या चिमुकल्यांना नदीतील खड्याचा अंदाज न आल्याने या खड्यात बुडून तिघांचा मृत्यू झाला. बुधवारी दुपारी ०१ वाजेच्या सुमारास सदरील घटना घडली असून उशीरा याबाबत माहीती मिळाल्याने सायंकाळी पोलिसांत उशीरा याबाबत फिर्याद दाखल करण्यात आली आहे.
एकाच गावातील या तीन चिमुकल्यांच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेत निलेश दिलवर पाडवी ०४ वर्षे, मेहर दिलवर पाडवी वय पाच वर्षे आणि पार्वती अशोक पाडवी वय ०५ वर्षे या तिघांचा मृत्यू झाला आहे. यामुळे कुटुंबियांवरही दुखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.