महाविकास आघाडी सरकारवर भाजपची काळी नजर आहे, पण…; काँग्रेसचा हल्लाबोल
मुंबई | भाजपने सत्तेसाठी पहाटेचा प्रयोग केला, परंतु तो फसल्यामुळे वैफल्यग्रस्त भारतीय जनता पक्ष महाविकास आघाडी सरकारविरोधात सातत्याने कटकारस्थाने करत आहे. सत्ता गेल्यामुळे भाजपची तडफड होत असून महाविकास आघाडी सरकारवर भाजपची काळी नजर आहे, परंतु भाजपची ही काळी जादू काही चालणार नाही. महाविकास आघाडी सरकार पूर्ण ५ वर्षे चालणार, असा विश्वास काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे.
भंडारा येथे ते मीडियाशी बोलत होते. ‘काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या निर्देशानुसार राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना या तीन पक्षाचे महाविकास आघाडी सरकार हे किमान समान कार्यक्रमाच्या आधारावर सत्तेत आलेलं आहे. मागील दोन वर्षांत करोनामुळं राज्य सरकारपुढं अनेक समस्यांचा डोंगर उभा होता. आता परिस्थिती पूर्वपदावर येत असून यापुढं किमान समान कार्यक्रम राबविला जाईल, असं पटोले म्हणाले. ‘सरकारमधील तीनही पक्ष बरोबरीचे भागीदार आहेत आणि त्याचा विरोधकांना त्रास होत आहे. महाविकास आघाडी सरकार अस्थिर व्हावं यासाठी विरोधकांकडून जाणीवपूर्वक अफवा पसरवल्या जात आहेत. भारतीय जनता पक्षानं केंद्रीय यंत्रणाचा गैरवापर करून, राजभवनच्या मदतीनं सरकार पाडण्यासाठी कितीही प्रयत्न केले तरी त्यात त्यांना यश येणार नाही. सत्ता नसल्यानं भाजपचा जीव कासावीस झाला आहे, परंतु महाविकास आघाडीचं सरकार भक्कम असून ५ वर्षांचा कार्यकाळ हे पूर्ण करेल, असंही ते ठामपणे म्हणाले.